मुरुड-जंजिरा । सावित्री पुलाच्या महाभयंकर दुर्घटनेनंतर सरकारला अचानक जाग आल्याने त्यांनी राज्यातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आडिट केले होते. धोकादायक पुलांची यादीच सरकारने त्यावेळी सादर केली होती. धोकादायक ठरणारे पूल बंद करून तेथे तातडीने नव्याने पूल बांधण्याच्या वल्गनाही सरकारने केल्या होत्या. मात्र, अलिबाग तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या खडताळ पुलाबाबत सरकारने अद्यापही कार्यवाही केलेली नाही. उलट त्याच धोकादायक पुलावरील रस्ता तयार करण्याचे काम जोमाने सुरू आहे. नव्याने पुलाचे बांधकाम करण्यात यावे, या मागणीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली आहे. त्यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. काम न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
अलिबाग तालुक्यामधील विविध प्रकल्प सरकारने गुंडाळून ठेवले आहेत, तर काही प्रकल्पांचे काम हे अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई-गोवा महामार्ग, अलिबाग-वडखळ रस्त्याचे चौपदरीकरण, विरार-अलिबाग रेल्वे, अलिबाग-मुंबई रेल्वे मार्ग त्याचप्रमाणे तालुक्यातील विविध अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे.अलिबाग-मांडवा हा रस्ता मांडवा जेटीवर येणार्या पर्यटकांमुळे जगाच्या नकाशावर पोहोचला आहे. त्याच मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याच रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे यासाठी सर्वपक्षीयांनी नागरिकांच्या सोबत विविध आंदोलने, मोर्चे, उपोषण, रास्ता रोको करून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला होता. सरकारने जनआंदोलनानंतर रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली हे चांगले असले तरी, याच मार्गावर ब्रिटिशकालीन खडताळ पूल आहे. या पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे.
नवीन पूल उभारणे गरजेचे
सावित्री पुलावरील दुर्घटनेनंतर राज्यासह जिल्ह्यातील सर्वच ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होेते. त्यानुसार खडताळ पूल हा वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या आशयाचा फलकही पुलाशेजारी लावला.बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. अहवालाप्रमाणे खडताळ पूल धोकादायक असल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचा फलक लावून सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम संपले असे सार्वजनिक बांधकाम विभागाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. याच खडताळ पुलाला पर्याय म्हणून नवीन पूल उभारणे गरजेचे आहे.