नगरपालिकेने दुसर्‍या आवर्तनासाठी भरली रक्कम

0

अमळनेर । संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त राज्यभरातून भाविक अमळनेर येथे येत असतात. यात्रोत्सवादरम्यान पाण्याची टंचाई भासू नये म्हणून नगरपालिकेने दुसर्‍या आवर्तनासाठी 10 लाख रूपये हतनूर प्रकल्पाकडे भरले आहेत. 8 रोजी दुसरे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी दिली. पहिल्या आवर्तनाचे पाणी 15 मे पर्यंत पुरणार हेते. मात्र वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. यात्रोत्सवात भाविकाचे हाल होऊ नयेत, तसेच नागरिकांकडे येणार्‍या पाहुण्यांसाठी पुरेसे पाणी मिळावे म्हणून पाण्याचे दिवस न वाढवता, 10 लाख रूपये भरून आवर्तनाद्वारे पाणी घेण्यात येत आहे.एका आवर्तनात 3.76 दशलक्ष घनमीटर एवढे पाणी मिळते.

बोगस नळ कनेक्शन बंद करण्याची मागणी
माजी आमदार साहेबराव पाटील यांनी अमळनेर शहराला पुरवल्या जाणार्‍या पाण्याचे ऑडीट केले आहे. दररोज पाणी पुरवठा होऊ शकतो, एवढे पाणी तापी नदीतून घेते जात असतांना, शहराला तीन-चार दिवसाआड पाणी पुरवठा का होतो असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. अंबर्षी टेकडीवरील 340 अश्वशक्ती पंपातून 5 लाख 2 हजार लीटर पाणी ताशी या वेगाने 20 तासात 1 कोटी 40 हजार लिटर पाणी तर, गांधली येथील 275 अश्वशक्ती पंपावरून ताशी 5 लाख 20 हजार लिटर याप्रमाणे 20 तासात 1 कोटी 4 लाख लिटर असे एकूण 2 कोटी लिटर पाणी दररोज अमळनेरात येते. त्यापैकी 50 लाख लिटर पाणी वाया जाते असे गृहित धरल्यास दीड कोटी लिटर पाणी येते. अमळनेर शहराची लोकसंख्या 1 लाख आहे. माणसी 70 ते 135 लिटर पाणी देण्याचा नियम असल्याने, दररोज शहराला 70 ते जास्तीत जास्त 1 कोटी 35 लाख लिटर पाणी लागते. मात्र रोज दीड कोटी लिटर पाणी येते, तरीही शहराला 3-4 दिवसाआड पाणी का मिळते असा प्रश्न माजी आमदार साहेबराव पाटील यांनी विचारला आहे. या मागे बोगस नळ कनेक्शन, आदी कारणे असून, ते बंद करण्याची मागणी केली आहे.