मुंबई: गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला सत्ता संघर्षावर अखेर पडदा पडला असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस या पक्षाच्या नेतृत्वाने नवे सरकार स्थापन होत आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली असून, ते उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. महाआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागेल आणि खातेवाटप कसं असेल याबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे. आगामी दोन दिवसांत खातेवाटपाबाबत ठरणार आहे, असं सांगण्यात येत आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घटनेनंतर अखेर मुख्यमंत्रिपदासाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. ते उद्या शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. उद्धव यांच्या रूपानं ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार आहे. मात्र, मंत्रिपदे आणि खातेवाटपाबाबत महाआघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या नव्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील. त्यात काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. दुसरीकडे अजित पवार यांची या सरकारमध्ये काय भूमिका असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. खातेवाटपाबाबत काँग्रेस नेते थोरात यांनी माहिती दिली आहे. खातेवाटपाबाबत आगामी दोन दिवसांत ठरेल. तसंच कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदे कोणत्या पक्षाला किती द्यायची याबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असं थोरात यांनी सांगितलं.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील असं सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील यांची नावे चर्चेत आहेत. याबाबत थोरात यांना विचारलं असता, उपमुख्यमंत्रिपदाबाबत अजून निर्णय व्हायचा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.