नागरिक सुधारणा विधेयकाला बुद्धीजीवी वर्गाचा विरोध

0

नवी दिल्ली: लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक पास झाले. आज राज्यसभेत विधेयक सादर केले जाणार आहे. या विधेयकावरून देशभरात विरोध सुरु झाला असून, काल पूर्वोत्तर राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसक वळण लागले होते. या विधेयकाच्या विरोधात आता देशातील बुद्धीजीवी वर्गाने विरोध केला आहे. देशातील ७२७ नागरिकांनी हवे विधेयक मागे घ्यावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये माजी न्यायाधीश, वकील, लेखक, अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यात जावेद अख्तर, नसीरुद्दीन शाह, अॅडमिरल रामदास यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे.

या प्रसिद्ध व्यक्तींनी केंद्र सरकारला नागरिकत्व सुधारणा विधेयक मागे घेण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. “नागरिकत्व सुधारणा विधेयक भारताच्या सर्वसमावेशक आणि सर्वांगीण दृष्टीकोनाचा भंग करीत आहे. ज्याद्वारे भारताला स्वातंत्र्यलढ्यात मार्गदर्शन मिळाले. आम्ही हे विधेयक सांस्कृतिक आणि शैक्षणिक समुदायांचे विभाजनशील, भेदभाव करणारे आणि असंवैधानिक असल्याचे मानतो आणि यामुळे भारताच्या लोकशाहीला नुकसान पोहोचले”, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

याचबरोबर, नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे संविधानाला धोका आहे. यासाठी आम्ही सरकारला हे विधेयक मागे घेण्याची मागणी करत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. याशिवाय, प्रस्तावित कायदा भारतीय प्रजासत्ताकाच्या मुख्य स्वरूपामध्ये मूलत: बदल करेल आणि यामुळे संविधानाद्वारे सादर केलेल्या सांघिक संरचनेला धोका निर्माण होईल, असेही म्हटले आहे.