कराड । कराडसह पाटण तालुक्यात अनेक गावात बिबट्या थेट नागरी वस्तीत शिरत आहे. नागरी वस्तीत बिबट्या फिरत असल्याचे दिसून आले आहे. किंबहुना अनेक गावांतील रस्ते बिबट्याचे नेहमीचेच भ्रमण मार्ग झाल्याचे दिसले. परंतु, याकडे प्रशासन गांभीर्याने पाहिले जात नाही. कराडसह पाटण दोन्ही तालुक्यात ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने बिबट्याची संख्या वाढली आहे. 2014 मध्ये बिबट्याची मोजणी झाली त्यावेळी 33 बिबट्या दिसल्याची नोंद वन विभागाकडे आहे. मात्र, त्यानंतर अलीकडे त्याची मोजदादच झालेली नाही. त्यामुळे वाढलेल्या बिबट्याच्या संख्येबाबत दस्तूर खुद्द वन विभागाच अनभिज्ञ आहे. त्यामुळे वाढत्या बिबट्यांच्या प्रजनाबाबत अंदाज लावताच येत नाही, अशी स्थिती आहे.
प्रशासनाला कधी येणार जाग?
दोन्ही तालुक्यांत बिबट्या विरूद्ध मनुष्य असा संघर्ष ऐरणीवर आला आहे. त्यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. वाठार येथे उद्दभवलेल्या संघर्षानंतर नागरी वस्तीत शिरणार्या कराडसह पाटण तालुक्यातील बिबट्यांची मोजदाद करण्यासाठी शासकीय पातळीवर हालचाल होण्याची गरज आहे. मानवी वस्तीत शिरलेला बिबट्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का? असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत.