नाणार प्रकल्पावरून महाविकासाघाडीत फुट !

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार प्रकल्पावरून राज्यातील महाविकास आघाडीत फुट पडल्याचे दिसत आहे. शिवसेनेचा नाणारला विरोध कायम असल्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या पहिल्या दौऱ्यात सिंधुदुर्गातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. पण, आता रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत नाणार आणि आयलॉगसारखे प्रकल्प झाले पाहिजेत अशी भूमिका घेतली आहे.

कोकणातल्या रोजगार निर्मितीसाठी नाणार, आयलॉग सारखे प्रकल्प आले पाहिजेत. अशी भूमिका रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली आहे. प्रकल्पांबाबत आम्हाला विचारल्याशिवाय पक्ष श्रेष्ठींनी भूमिका ठरवू नये असे विधान कुमार शेट्ये यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न देखील विचारला जात आहे.

शिवसेना यावर काय भूमिका घेते हे पाहणे आता औस्त्युक्याचे ठरणार आहे. नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेवर सध्या जोरदार टीका सुरू आहे. काही स्थानिक शिवसेना नेते आणि पदाधिकारी देखील समर्थन करताना दिसत आहेत. त्यावरून सध्या सेनेतच दोन गट दिसू लागले आहेत. त्यामुळे आता नाणार आणि आयलॉग सारख्या प्रकल्पांबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी नाणार येथे 1 मार्च रोजी शिवसेना जाहीर सभा घेणार आहे. या सभेला खासदार, आमदार, जिल्हासंपर्क प्रमुख, तालुकाप्रमुखांसह इतर नेते देखील हजर राहणार आहेत.