नाना पटोलेंचा शरद पवारांशी पंगा?

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने स्वबळाचा पुनरुच्चार करत आहे. तर पक्षश्रेष्ठीकडून अद्याप ठरलं नसल्याचं सांगितलं जात आहे. असं असलं तरी काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील दोन पक्षात चलबिचल होताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसचं नेमकं धोरण काय, अशी चर्चाही सुरू आहे. या सगळ्या राजकीय चर्चा सुरू असतानाच काल काँग्रेसचे मंत्री शरद पवारांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी पवारांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. तुम्हाला पुढील विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढायची असेल, तर स्पष्ट सांगा, अशा शब्दांत पवारांनी नाराजी बोलून दाखवली. यानंतर आता पटोलेंनी २०१४ मध्ये मिळालेल्या धोक्याची आठवण करून दिली आहे. ‘आमची लाईन ठरलेली आहे. स्वबळाच्या मुद्द्यावर आम्ही कायम आहोत. कारण याआधी आम्ही अनेक धक्के सहन केले आहेत. २०१४ मध्ये मिळालेला धोका पुन्हा मिळू नये यासाठी आम्ही स्वबळाची तयारी सुरू केली आहे,’ असं नाना पटोले म्हणाले. २०१४ मधील घटनांची आठवण करून देत पटोलेंनी राष्ट्रवादीबद्दल अविश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे.

२०१४ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीनं स्वबळावर निवडणूक लढवली. युती तुटल्यानं शिवसेना आणि भाजपही स्वतंत्र लढले. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र ते बहुमतापासून दूर राहिले. या परिस्थितीत राष्ट्रवादीनं भाजपला बाहेरून पाठिंबा दिला आणि राज्यात भाजपचं सरकार आलं. आता पटोलेंनी २०१४ मध्ये मिळालेल्या धोक्याची आठवण करून दिली आहे. नाना पटोलेंच्या विधानाला राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. हे सरकार कायम राहावं, ते अडचणीत येऊ नये ही तिन्ही पक्षांची आणि त्या पक्षांच्या नेत्यांची जबाबदारी आहे. कालच काँग्रेसचे मंत्री शरद पवारांना भेटून गेले आहे. त्यात पवारांनी याबद्दलची भूमिका मांडली. तिन्ही पक्षातल्या नेत्यांनी विधानं करताना काळजी घ्यायला हवी. आपल्या विधानांचा परिणाम सरकारवर होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. तशी काळजी घेतली जात नसेल, तर ते दुर्दैवी आहे,’ असं शिंदे म्हणाले. काँग्रेसला सोबत राहायचं नसेल, तर त्यांनी तसं स्पष्ट सांगावं, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं.

भाजपाला पर्याय फक्त काँग्रेस : पटोले

आज देशामध्ये भाजपाला पर्याय फक्त काँग्रेस आहे. भाजपाने केंद्रामध्ये बसून देश विकायला काढला आहे, देश विकला. लोकांचं जगणं मुश्किल केलं आहे. काही लोकांना तर असं वाटतं आहे की करोना परवडला पण ही महागाई परवडत नाही. असं लोक आता बोलू लागले आहेत. भाजपाने करोना आणि महागाई या दोन्हीचा संगम करुन आता देशातल्या लोकांचं जगणं मुश्किल केलं आहे. म्हणूनच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली २०२४ मध्ये केंद्रात सरकार तयार होणारच असल्याचं पटोले म्हणाले.