मुंबईः विधानसभा अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीकडून किसन कथोरे तर कॉंग्रेस कडून नाना पटोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपने अध्यक्षपदासाठी माघार घेतल्याने नाना पटोले यांची बिनविरोध निवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
विधानसभा अध्यक्ष हा बिनविरोध व्हावा ही महाराष्ट्राची परंपरा आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड यंदाही बिनविरोध व्हावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आग्रह धरला होता. त्यामुळे मी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर व सविस्तर चर्चा केली. त्यानंतर भाजपने या निवडणुकीतून माघार घेण्यासंबंधीचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
गेल्या महिनाभरातील नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शनिवारी विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला १६९ आमदारांचे समर्थन असल्याचेही याद्वारे स्पष्ट झाले. ठरावाप्रसंगी एमआयएमचे दोन तसेच मनसे व माकपच्या प्रत्येकी एका आमदाराने तटस्थ भूमिका घेतली. तर भाजपने सभागृहातून सभात्याग केल्याने विश्वासदर्शक ठराव प्रस्तावाच्या विरोधात शून्य मते पडली.