रत्नागिरी : नायरी निवळी घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एसटी बसने तीन वेळेस पलटी मारल्याने अपघातात सुमारे ३५ प्रवासी जखमी झाले असून एक महिला गंभीर जखमी आहे. या बसमध्ये १५ हून अधिक शालेय विद्यार्थी प्रवास करत होते. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देवरुख आगाराची ही एसटी बस सकाळी ५.४५ वाजता निवळीहून संगमेश्वरकडे जात होती. कापाच्या वाडीजवळील घाटातील धुक्यामुळे बस चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यातच गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज स्थानिकांनी वर्तीवला आहे. या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त असून अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.