नारदाच्या गादीचा अपमान करणार्‍या पोलिस निरीक्षकांना निलंबीत करा

रवींद्र पाटील : अप्रिय कृत्याने सहिष्णू वारकर्‍यांमध्ये तीव्र संताप

मुक्ताईनगर : चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक के.के.पाटील यांनी कीर्तन सुरू असताना नारदाच्या गादीवर बुटांसह पाय ठेवून कीर्तनकार, टाळकरी उपस्थितांना अर्वाच्य भाषेत दमदाटी केली होती. या घटनेने नेहमी सहिष्णू असणार्‍या वारकरी भाविकांत प्रचंड संताप निर्माण झाला आहे. पोलिस निरीक्षकांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केली आहे.

सहिष्णू संप्रदायाचा अवमान सहन करणार नाही
वारकरी संप्रदाय सर्वांना सोबत घेवून चालणारा, समाजात जातीभेद, विषमता यांना थारा न देणारा, अनिष्ट-रूढी परंपरा न मानता देवप्राप्तीसाठी भजन, कीर्तन करणारा सहिष्णू संप्रदाय आहे. कधीही कायदा हातात घेतल्याचे उदाहरण नसलेला शांतताप्रिय संप्रदायात मात्र निरीक्षकांच्या कृत्याने संतापाची तीव्र लाट पसरली आहे. चाळीसगाव शहरातील पोलिस निरीक्षकांनी संप्रदायातील अत्यंत मानाच्या नारदाच्या गादीवर चालू कीर्तनात बुटासह येवून अर्वाच्य भाषेत उपस्थितांना दमदाटी केली. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांनी सामोपचाराने आयोजकांना समज दिली असती किंवा गुन्हा दाखल केला असता मात्र तसे न करता थेट बुटासह नारदाच्या गादीवर जावून अर्वाच्य भाषा वापरून धमकी देणे ही बाब निंदनीय व निषेधार्थ आहे.

वारकर्‍यांच्या भावना लक्षात घेवून व्हावी कारवाई
चाळीसगावचे पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांनी वारकरी संप्रदायाचा घोर अपमान केला असून यामुळेच भाविकांमध्ये संतापाची तीव्र भावना आहे. पोलिस प्रशासन व वारकरी बांधवांमध्ये तेढ निर्माण करणार्‍या निरीक्षक के. के.पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी रवींद्र पाटील यांनी केली आहे. वारीयात्रा, उत्सवात, कार्यक्रमात, मंदिरात लाखो वारकर्‍यांसाठी हजारो पोलिस बंदोबस्तावर असतात परंतु कुठेही दुरावा होत नाही मात्र चाळीसगावात अधिकार्‍याने आकसापोटी बेजवाबदारीपुर्वक वागणुकीने समाजात तेढ निर्माण केल्याने वारकर्‍यांमध्ये संतापाची भावना आहे. अधिकार्‍यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे रवींद्र पाटील यांनी केली आहे.