कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या १० मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी प्रसिद्ध केलेल्या निविदेला प्रतिसादच मिळालेला नसल्यामुळे फेरनिविदा काढण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर ओढावली आहे. मात्र मागील वर्षी केलेल्या कामाच्या बिलाची रक्कम अद्याप कंत्रादारांना अदा करण्यात आली नसल्यामुळे कंत्राटदार पालिकेची कामे करण्यास तयार नाहीत. यामुळे यंदाही नालेसफाई रखडण्याची भीती व्यक्त होत आहे.
पालिकेच्या शहरी भागात ५६, तर नव्याने समाविष्ट केलेल्या २७ गावांतील २१ प्रभागांत २९ असे एकूण ८३ मध्यम व मोठे नाले आहेत. या नाल्यांची पावसाळ्यापूर्वी सफाई न झाल्यास शहरात सांडपाणी साचण्याची भीती असल्यामुळे नाल्यातील गाळ काढून पाण्याच्या प्रवाहाला मार्ग मोकळा करून दिला जातो. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणे अपेक्षित असते. मात्र मागील काही वर्षांत नालेसफाईसाठी कंत्राटदारच मिळत नसल्यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतर परिसरात सांडपाणी साचते. त्यानंतर अधिकारी एखाद्या कंत्राटदाराकडून जबरदस्तीने नालेसफाई करून घेतात.
मागील ४ वर्षांपासून हीच स्थिती आहे. पावसाळा सुरू झाला तरी शहरातील नाल्यांतील गाळ तसाच असतो. यंदा पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात आल्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर रवींद्र जौरस यांनी शहरातील १० नाल्यांच्या सफाईची निविदा प्रसिद्ध केली होती. मात्र यातील ७ निविदांना प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे यासाठी फेरनिविदा प्रसिद्ध करावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र निविदेला प्रतिसाद का मिळाला नाही, याची विचारणा केली असता मागील वर्षी काम केलेल्या कंत्राटदारांची बिले अद्याप अदा करण्यात आलेली नाहीत. मलनिस्सारण विभागाकडून लेखा विभागाकडे कंत्राटदारांच्या कामाची बिले ८ महिन्यांपूर्वीच पाठविण्यात आली आहेत. मात्र त्यांच्याकडून संबंधित कंत्रादारांन रक्कम देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
मागील वर्षाची बिले मिळाल्याखेरीज कामगाराचा पगार आणि इंधनाचा खर्च करणे शक्य नसल्यामुळे मागील वर्षीची बिले मिळाल्यानंतर नव्याने कामे स्वीकारणे शक्य होईल, मात्र पालिका प्रशासनाकडे वांरवार पाठपुरावा केल्यानंतरही बिले निघत नसल्याची कंत्राटदारांची तक्रार आहे. त्यामुळे ३१मे पर्यंत ही नालेसफाई पूर्ण होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.