नंदुरबार । नंदुरबार पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात नावीण्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी करावी, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणारा निधी मार्च 2018 अखेर खर्च करावा. निधी खर्च करण्यासाठी नियोजन करावे. प्रशासकीय मान्यता घेत कामांचे कार्यादेश तत्काळ द्यावेत, असेही निर्देश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी अधिकार्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात आज सकाळी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.
विविध विषयांवर चर्चा
यावेळी कृषी, वने, सिंचन विहिरी, आरोग्य, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, जलयुक्त शिवार योजना, आरोग्य, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, लघुसिंचन, सहकार, वृक्षारोपण, पशुसंवर्धन, वीज वितरण, पाडा विद्युतीकरण, सौर ऊर्जा पंप, मत्स्य व्यवसाय आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी झालेल्या चर्चेत आमदार श्री. रघुवंशी, श्री. नाईक, डॉ. गावित, ङ पाडवी, श्री. पाडवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल रावल, किरसिंग वसावे, संध्या पाटील, देवमन पवार, सागर तांबोळी आदींनी चर्चेत भाग घेतला. जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.
64 कोटी रूपयांचा आराखडा
नंदुरबार जिल्ह्याचा 2018-2019 या आर्थिक वर्षाचा आराखडा जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) चा आराखडा 64.08 कोटी रुपयांचा असून या नियतव्यास मंजुरी देण्यात आली. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 11.40 कोटी रुपये, आदिवासी उपयोजना (टीएसपी) करीता 450.24 कोटी रुपयांचा, तर आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना (ओटीएसपी) करीता 6 कोटी 25 लक्ष रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे.
14 हजार शेतकर्यांना लाभ
जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले, नंदुरबार जिल्हा नीती आयोगाने दत्तक घेतला आहे. एकूण 48 बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. त्यासाठी पालक सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे सांगितले. नंदुरबार जिल्ह्यातील 14 हजार 598 शेतकर्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत 33 कोटी रुपयांचा निधी संबंधित शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक एस.वाय.पुरी यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनीताई नाईक, खासदार डॉ. हीना गावित, आमदार सर्वश्री चंद्रकांत रघुवंशी, सुरुपसिंग नाईक, डॉ. विजयकुमार गावित, ङ के. सी. पाडवी, उदेसिंग पाडवी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी यांच्यासह नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
प्रश्न सोडवायला प्राधान्य
आरोग्य, महिला, पाणीपुरवठा, शिक्षण, मुलांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे. जलयुक्त शिवार अभियानासह विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना तालुका, ग्राम पातळीवर लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे. यंत्रणांनी निधी उपलब्ध होताच कामांना सुरवात करावी. कृषी विभागासह विविध योजनांची प्रचार व प्रसिध्दी करीत योजना गावपातळीवरील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत.श्री. रावल यांनी यावेळी दिले.