नवी दिल्ली : निवडणुकीमध्ये आचार संहिता लागू झाल्यानंतर उमेदवार रात्रीच्या वेळी फोन, एसएमस किंवा व्हॉट्सअॅपच्या मदतीने मत मागतात. निवडणूक आयोगाच्या हे लक्षात आल्यानंतर यासंदर्भात आता नवीन सूचना जारी करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीत आचार संहिता लागू झाल्यानंतर उमेदवारांना आता याद्वारे प्रचार करता येणार नाही आहे. निवडणूक आय़ोगाचे सचिव एन. टी. भूटिया यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत.
आचार संहिता लागू झाल्यानंतर प्रचारासाठी दिवसा संवाद किंवा वेगवेगळ्या माध्यमातून अभियान चालवू शकता. प्रचारादरम्यान रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊड स्पीकरचा वापर करता येणार नाही. रात्री 10 नंतर सभा देखील घेतली जाऊ शकत नाही. पण उमेदवार रात्रीच्या दरम्यान घरोघरी जाऊन किंवा फोन, एसएमएस किंवा आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रचार करत होते. पण आयोगाने आता यावर देखील बंदी आणली आहे. आयोगाने म्हटलं की, नागरिकांचे सामान्य जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक आय़ोगाने सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशाचा संदर्भ देत यावर्षी 20 एप्रिलला जारी करण्यात आलेल्या सूचना अंमलात आणत हा निर्णय घेतला आहे.