मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळ येथे जाहीर सभेत पुलवामा घटनेबद्दल बोलण्यास मनाई करणाऱ्या निवडणूक आयोगाला आमची सत्ता आल्यास दोन दिवस कारागृहात टाकू, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविला असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
यवतमाळच्या दिग्रस येथे पुलवामा हल्ल्यात ४० सैनिक गमावल्यानंतरही बेजबाबदार पंतप्रधान मोदींना पुन्हा सत्ता देणार का? असा सवाल त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी पुलवामा हल्ल्याबाबत आम्हाला न बोलण्याचे निवडणूक आयोगाकडून कसे सांगू शकते? आपल्या संविधानात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आले आहे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार देण्यात आला आहे. जर सत्तेत आलो तर निवडणूक आयोगाला दोन दिवसांसाठी जेलमध्ये टाकू असे त्यांनी म्हटले होते. या विधानानंतर त्यांच्या विरुध्द दिग्रस पोलीस ठाण्यामध्ये कलम ५०३, ५०६, १८९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेडकरांनी माझ्या निवडणूक आयोगाच्या विधानाला मुद्दा बनवले जात असल्याचे म्हटले आहे.