निवेदन देण्यासाठी आता केवळ ५ व्यक्तींनाच प्रवेश

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आदेश

जळगाव – कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने गर्दी टाळण्याकरीता निवेदन देण्यासाठी आता केवळ ५ व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच शासकीय अर्ज, निवेदनही ई-मेलवर सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जारी केले आहे.
जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढु लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून गर्दी टाळुन कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्या जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातही विविध विषयांचे निवेदन देण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आता याबाबत नव्याने आदेश जारी करण्यात आले आहे. त्यात शासकीय अर्ज, निवेदने दाखल करण्यासाठी प्रत्यक्षात न येता ते संबंधित शाखेच्या शासकीय ई-मेलवर सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. तसेच विविध विषयांबाबतचे निवेदन देण्यासाठी येणार्‍या सर्व नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांचे स्वीय्य सहाय्यक यांच्याकडुन पूर्व निर्धारित वेळ घेऊन केवळ ५ व्यक्तींनाच निवेदन सादर करता येणार आहे.
सुनावण्या ऑनलाईन होणार
केवळ अत्यावश्यक आणि तातडीच्या विषयाबाबतच्या सुनावणीकरिता पक्षकारातर्फे केवळ एकच वकील हजर राहतील आणि जर वकीलांची नेमणूक नसेल तर केवळ वैयक्तीक पक्षकारच उपस्थित राहील. उर्वरीत सर्व सुनावण्या आता ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.