निसर्गवेड्या अवलियाने उलगडले जंगलाचे विलक्षण साम्राज्य

0

पुणे । तब्बल 400 दिवस घनदाट जंगलातील वास्तव्य… 1500 किलोमीटरचा पायी आणि 1200 किलोमीटरचा सायकलने केलेला प्रवास… जंगलात राहताना आलेले आश्‍चर्यकारक अनुभव… जंगलातील जैवविविधता…. ऋतुमानानुसार होणारे बदल… प्राण्यांची जीवनशैली… आदिवासींचा सहवास असे संपूर्ण 400 दिवसांचे नागझिरा जंगलातील वास्तव्य निसर्गमित्र किरण पुरंदरे यांनी उपस्थितांसमोर उलगडले.

सूत्रधारतर्फे भारतीय कथाकथनाच्या विविध शैलींची ओळख करून देण्यासाठी ’टेल्स ऑफ नेचर’ या टॉक शोचे आयोजन सेनापती बापट रस्ता येथील कलाछाया येथे करण्यात आले होते. टॉक शो अंतर्गत निसर्गमित्र किरण पुरंदरे यांची मुलाखत घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सूत्रधारच्या आयोजिका मधुरा आफळे, तोषल गांधी, नताशा पूनावाला, वल्लरी आपटे यांनी किरण पुरंदरे लिखित कविता सादर केली.

पुरंदरे म्हणाले, जंगलात माणूस हस्तक्षेप करत नाही, त्यामुळेच ते अजूनही सुंदर आहे. एकाच पठडीत राहणे निसर्गाला मान्य नाही. त्यामुळेच जंगलात देखील प्रचंड विविधता दिसते. नागझिर्‍यातील 400 दिवस हा विलक्षण अनुभव होता. तलावासाठी प्रसिद्ध असलेल्या या जंगलात 36 हजार तलाव आहेत. कृत्रिम साधनांचा वापर न करता वास्तव्य करण्यासाठी टोकाचे वेड हवे असते. निसर्गाच्या जवळ आपण जायला हवे. त्याच्याशी संवाद साधायला हवा. प्रत्येक मूल जन्मत:च निसर्गमित्र असते. त्यांच्यावर बालपणीच निसर्गाचे संस्कार व्हायला हवेत. असेही पुरंदरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पावशा, भारद्वाज, रानकोंबडा अशा विविध पक्षांचे हुबेहुब आवाज काढून उपस्थितांना थक्क केले.