मुंबई । मुंबई क्रिकेट संघटनेच्या टी-20 मुंबई लीगच्या आयोजनामागील शुक्लकाष्ठ काही केल्या संपत नाही आहेे. एमसीएच्या या बहुप्रतिक्षीत लीगच्या आयोजनात आतापर्यंत अनेक विघ्ने आली आहेत. आता नीरव मोदी-पीएनबी घोटाळ्याचा फटका या लीगला बसला आहे. या स्पर्धेतील सहा फ्रँचायझींमधील एक असलेल्या श्री नमन ग्रूप ऑफ डेव्हलपर्स या रिअल इस्टेट कंपनीने बँक गॅरंटी भरण्यास असमर्थ असल्याचे कारण देत माघार घेतली आहे. नीरव मोदीने पीएनबी बँकेत 11 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्यानंतर बँकांनी बँक गॅरंटीसंदर्भातील नियम अधिक कडक केल्यामुळे नमन ग्रूपने या स्पर्धेतून आपली फ्रँचायझी मागे घेतली आहे. नमन ग्रूपने या स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क असलेल्या प्रोबॅबिलिटी स्पोर्टसला पत्र लिहून आपण या स्पर्धेतून माघार घेत असल्याचे कळवले आहे. आपणास बँक गॅरंटी मिळवण्यात अडचणी येत आहेत, असेही या पत्रात त्यांनी म्हटल्याचे प्रोबॅबिलिटी स्पोर्टसचे सीईओ कादर मकानी यांनी सांगितले. नीरव
मोदीने केलेल्या पीएनबी घोटाळ्यानंतर बँकांनी याप्रकरणी बँक गॅरंटीसंदर्भातील नियम अधिक कडक केले आहेत. यापूर्वी व्यवस्थापकीय स्तरावर बँक गॅरंटी सहजपणे उपलब्ध होत होती. पण आता बँक गॅरंटी मिळवण्यासाठी बँकेच्या मुख्य कार्यालयाला फोन करावा लागतो. त्यानंतर बँक गॅरंटी मिळवण्यासाठी एका महिन्याचा कालावधी लागतो. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी आम्ही श्री नमन ग्रूपला बुधवारपर्यंतची मुदत दिली आहे. पण याप्रकऱणी तोडगा निघू शकण्याची शक्यता फारच कमी आहे,असे एमसीएच्या एका अधिकार्याने सांगितले. प्रत्येक फ्रँचायझीने बोली लावून विकत घेतलेल्या रकमेपेक्षा पाच पटीने रकमेची बँक गॅरंटी सर्व संघमालकांनी सादर करणे अनिवार्य आहे. श्री नमन ग्रूपने मुंबई उत्तर या संघाची फ्रँचायझी विकत घेण्यासाठी सर्वाधिक रकमेची म्हणजेच 6.5 कोटींची बोली लावली होती. त्यासाठी श्री नमन ग्रूपने 1 कोटी रुपयांची रक्कम एमसीएकडे भरली होती.