नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशातील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. नोटाबंदीनंतर 99 टक्के जुन्या नोटा बँकांमध्ये परत आल्याची माहिती बुधवारी रिझर्व्ह बँकेने जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधानांच्या नोटाबंदीच्या निर्णयावर त्यांनी टीका केली. पंतप्रधानांनी 3 लाख कोटी काळा पैसा बँकेत जमा झाल्याचा दावा केला होता. मात्र, रिझर्व्ह बँकेने हा दावा पूर्णपणे फोल ठरला होता. त्यामुळे नोटाबंदी हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा आहे, असा आरोप आनंद शर्मा यांनी केला.
अपयश लपविण्याचा प्रयत्न
प्रत्येक टप्प्यावर सरकारकडून नोटाबंदीच्या अपयशाचे सत्य लपवून ठेवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागला. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला तब्बल 2.25 लाख कोटी रूपयांचे नुकसान सहन करावे लागेल. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट दोषी आहेत. नोटाबंदीचा निर्णय ही चूक होती, हे सत्य जनतेने स्वीकारले असते. मात्र, हा निर्णय योग्यच होता असे सातत्याने सांगणे, हे चूक होते. नोटाबंदीमुळे जादा रक्कम येणार नाही, हे सरकारला माहीत होते, असे आनंद शर्मा म्हणाले.