‘नो टेन्शन’आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू: चंद्रकांत पाटील

0

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. अजित पवारांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीने याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दोन दिवस सुनावणी झाल्यांनतर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. उद्याच आणि इन कॅमेरा खुले बहुमत चाचणी घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ ३० तास उरले आहेत. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असून उद्या बहुमत सिद्ध करून दाखवू असा विश्वास व्यक्त केला आहे. उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, तर खुलं मतदान घ्या. या निकालाचं थेट प्रक्षेपण करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. विश्वासदर्शक ठराव जास्तीत जास्त लांबणीवर टाकण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. तसे युक्तिवाददेखील त्यांच्या वकिलांकडून करण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश देत भाजपाला मोठा धक्का दिला आहे. भाजपाला विधानसभेत तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात यावेत यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं याचिका दाखल केली होती.