कोलकाता : दुर्गा विसर्जन मोहरमनंतर करा असा आदेश ममता बॅनर्जी सरकारने पश्चिम बंगालसाठी काढला होता. त्याविरोधातील दाखल जनहित याचिकेवर कोलकाता उच्च न्यायालयाने निर्णय देताना ममता सरकारला जोरदार चपराक दिली आहे. मोहरमच्या दिवसासह सर्व दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत दुर्गा विसर्जन करा, असा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे.
या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी दुर्गा विसर्जन आणि मोहरमचा ताझिया यांचे मार्ग निश्चित करा असेही न्यायालयाने पोलिसांना सांगितले आहे. न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारवर ताशेरे ओढताना म्हटले की सरकार अशाप्रकारे लोकांच्या श्रद्धेत दखल देऊ शकत नाही. कोणत्याही आधाराशिवाय सरकार म्हणून असलेल्या ताकदीचा वापर करू नका.सरकारकडे अधिकार आहेत, पण अमर्याद नाहीत. कोणत्याही आधाराविना आपल्या ताकदीचा वापर करणे चुकीचे आहे. शेवटच्या पर्यायाचा विचार शेवटीच व्हायला हवा. बुधवारीदेखील कोर्टाने या मुद्द्यावरून ममता सरकारला फटकारले होते.