पंतप्रधानांकडून स्त्री गौरव!

0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – नवीन वर्षाच्या प्रारंभानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम ‘मन की बात’ या कार्यक्रमातून पुन्हा एकदा देशवासीयांशी रविवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील महिलांचे भरभरून कौतुक केले. एक मुलगी दहा मुलांच्या बरोबरीची असते, असे स्कंध पुराणातही म्हटले आहे. देशातील महिला विविध क्षेत्रात अन्यन साधारण कामगिरी बजावत आहे, असे सांगत संपूर्ण रेल्वे स्थानक महिला कर्मचारी सांभाळत असलेल्या देशातील एकमेव माटुंगा रेल्वे स्थानकातील महिला कर्मचार्‍यांचा आवर्जून उल्लेख करत त्यांचेही कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.

कल्पना चावलाने देशाचे मान उंचावली
‘येत्या 1 फेब्रुवारीरोजी कल्पना चावलाची पुण्यतिथी आहे. कल्पना चावला भलेही आज आपल्यात नसेल. पण तिने देशाची मान उंचावली आहे. भारतात प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असल्याचे पाहून आनंद होतो. सर्वच क्षेत्रात स्त्री शक्ती दिसत आहे. विविध क्षेत्रात अनन्य साधारण कामगिरी बजावणार्‍या काही महिलांनी नुकतीच राष्ट्रपतींची भेट घेतली होती. आज महिला कुठे नाहीत? बस ड्रायव्हर महिला आहेत, महिला चालक आहेत, एवढेच नव्हे तर महिलांनी एव्हरेस्टही सर केले आहे. पंतप्रधानांनी भावना कांत, मोहना सिंह आणि अवनी चतुर्वेदी या महिला पायलट्सचा उल्लेख केला. भारतीय हवाई दलातील या तीनही पहिल्या महिला अधिकारी आहेत, ज्यांनी सुखोई-30 लढाऊ विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे.

बिहारचेही केले कौतुक
देशातील माटुंगा स्टेशन हे एकमेव स्टेशन आहे, जिथे महिला सर्व काम सांभाळत आहेत, असं सांगत माटुंगा स्टेशनच्या कर्मचारी महिलांचा मोदींनी गौरव केला. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील महिलांची ताकद पाहून विदेशी पाहुणेही अचंबित झाले. दंतेवाडा सारख्या नक्षलवादी भागातील आदिवासी महिलाही स्वावलंबी होत आहेत, याकडेही मोदींनी लक्ष वेधले. यावेळी मोदींनी बिहार सरकारचे कौतुक केले. बिहार सरकारने हुंडाविरोधी प्रथा आणि बालविवाहाविरोधात चांगली कामगिरी केल्याचं ते म्हणाले. दोन दिवसांपूर्वीच आपण मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला. दहा देशांचे प्रमुख पहिल्यांदाच यावेळी हजर होते, असंही त्यांनी सांगितलं.