मुंबई: देशात सुधारित नागरिक कायदा, एनआरसी वरून अनेक ठिकाणी हिंसाचार घडून, आंदोलन करण्यात आली. या आंदोलनामध्ये अनेक महाविद्यालय, विद्यापीठ मधील संघटनांनी सहभाग घेतला होता. राज्यात हा कायदा लागू न करण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम संघटनांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना पंतप्रधानांवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला.
महाराष्ट्रात हा कायदा लागू करणार नसल्याची भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काल मुस्लिम संघटनांचे शिष्टमंडळ जाऊन भेटले. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्यावर पंतप्रधान म्हणून विश्वास ठेवूयात, त्यांनी देशभरात एनआरसी कायदा लागू होणार नसल्याचे म्हटले आहे. देश म्हणून आपण एक रहायला हवे. असे न केल्यास त्याचे देशाला परिणाम भोगावे लागतील, असा सल्ला त्यांनी आझमी यांना दिला.
शिवसेनेचा मूळ मुद्दा हिंदुत्व आहे आणि राहील. परंतू मी किमान समान कार्यक्रमांतर्गत काम करणार आहे. पंतप्रधानांनी एनआरसी लागू न करण्याचे सांगितले त्यावर विश्वास ठेवावा लागेल. परंतू महाराष्ट्रात कोणाला त्रास होवू देणार नाही, असे आश्वासन दिल्याचे अबू आझमी यांनी सांगितले.