पटोलेंनंतर आता देशमुखांनी सुनावले!

0

नागपूर : पंतप्रधानांना लक्ष्य करीत नाना पटोले यांनी खासदारकी सोडली. आता भाजपचे नागपूरमधील काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सुनावले आहे. भाजप अद्याप खासदार पटोलेंच्या राजीनाम्यातून सावरले नसतानाच स्वपक्षाच्या आमदाराचे तक्रारपत्र आल्याने भाजप नेते हैराण झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करूनदेखील परिणामकारक बदल झालेले नाहीत. शेतकरी सुखी नाही. तरुणांना रोजगार नाही. कायदा सुव्यवस्था अधिकच बिघडली आहे. मेट्रो रेल्वे, समृद्धी महामार्ग थांबवा आणि आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांकडे लक्ष द्या, अशी सूचना देशमुखांनी सरकारला केली आहे. देशमुखांच्या या पत्रामुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे.

कायदा-सुव्यवस्था अधिक बिघडली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, 6 डिसेंबर रोजी आमदार देशमुख यांनी वेगळ्या विदर्भाचे निमित्त करीत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती आणि त्याविषयीची गरज या सात पानांच्या पत्रात सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. फडणवीस सरकारने गेली तीन वर्षे प्रयत्न करूनही राज्यातील लोकजीवनात काही परिणामकारक बदल झालेला नाही. शेतकरी सुखी नाही, युवकांना रोजगार नाही, पिकांना भाव नाही, कायदा-सुव्यवस्था अधिक बिघडली आहे, नागपूर क्राइम कॅपिटल बनले, असे आशिष देशमुख यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. नागपूर मेट्रो, स्मार्ट सिटी, समृद्धी महामार्ग यांसारख्या प्रकल्पामुळे जनतेचा फायदाच होणार आहे. या प्रकल्पांवर हजारो कोटी खर्च होत आहेत. मात्र या कामासाठी लागणारा पैसा लहान उद्योगांना सबसिडी म्हणून दिला असता तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असती, असे मत आशिष देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

सरकारला घरचा आहेर
मेट्रो रेल्वे प्रकल्प रोखून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घ्यावा, अशीही मागणी आशिष देशमुख यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे. राज्य सरकार केवळ शहरी विकासाकडे लक्ष देत आहे. ग्रामीण जनता आणि शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधक राज्य सरकारला चौफेर घेरण्याच्या प्रयत्नात असताना सत्ताधारी भाजपचे आमदार आशिष देशमुख यांच्या पत्रामुळे फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात असेपर्यंत विदर्भाचा विकास अशक्य
राज्यावर असलेल्या साडेचार लाख कोटी रुपयांच्या कर्जाने आर्थिकस्थिती कमकुवत आहे. त्यातून विदर्भाचा विकास खुंटला. महाराष्ट्रात असेपर्यंत विदर्भाचा विकास शक्य नसल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. राज्यातील 90 टक्के खनिज संपदा विदर्भात आहे. महागड्या विजेमुळे या भागातील उद्योग स्वस्त वीज असलेल्या छत्तीसगडमध्ये स्थलांतरित झाले. त्यातून बेरोजगारी वाढली. शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम घ्यावा, असे सरकारला वाटत नाही, याबद्दल आश्चर्य वाटते, असे देशमुख यांनी म्हटले आहे.