पट्टेदार वाघाचे सुकळी परीसरात पुन्हा दर्शन : शेतकर्‍यांमध्ये घबराट

शेतकर्‍याने मोबाईलमध्ये छबी केली कैद : जंगलात पायाभुत सुविधा वाघांवर शेत-शिवारात भटकंतीची वेळ

मुक्ताईनगर : गत आठवड्यात तालुक्यातील सुकळी परीसरातील केळी बागेत एक पट्टेदार वाघ विश्रांती घेत असलेल्या अवस्थेत आढळून आला होता.वाघाची मजेदार छबी नागरीकांनी मोबाईलमध्ये शुट केल्याची घटना ताजी असतानाच येथील शेतकरी वैभव पाटील हे शनिवार, 7 रोजी शेत नांगरत असताना शेतकर्‍यांना रात्री दहाच्या सुमारास ट्रॅक्टरच्या लाईटच्या प्रकाशात समोर बांधावर पट्टेदार वाघ दिसून आला. स्वत:जवळच्या मोबाईलमध्ये पाटील यांनी समोरचा देखावा कैद केला.

रान डुकराची केली होती शिकार
तीन दिवसांपूर्वी शेजारच्या केळी बागेत वाघाने रानडुकराची शिकार केली होती.तसेच गुराख्यासह आणखी दोघांनाच्याही नजरेत वाघ दिसुन आला. यामुळे याच परीसरात वाघाचा मुक्त संचार असल्याचे सिद्ध होत आहे. या भागातील शेतकर्‍यांमध्ये भीतीदायक वातावरण आहे. वनविभागाकडुन एक प्रशिक्षित टिम नेमून गस्त घालावी तसेच संवेदनशील भागातील केळीबागेत शेतीकामे करतांना शेतकर्‍यांना सहकार्य करावे, अशी मागणीवजा अपेक्षा केळी उत्पादक शेतकरी वर्गाची आहे मात्र वनविभागाच्या वरीष्ठ पातळीवरुन सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वाघांचा मुक्त संचार
देशभरातून पट्टेदार वाघांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यातील (वडोदा वनक्षेत्र) मुक्ताई-भवानी व्याघ्र अधिवास क्षेत्र असून या क्षेत्रात आठ-दहा वाघांचा मुक्त संचार असल्याने जिल्ह्याच्या वैभवात भर पडली आहे. ही जिल्हावासीयांसाठी अभिमानाची बाब आहे मात्र आजपर्यत या अधिवास क्षेत्राचा अपेक्षित विकास हवा तितका झाला नाही. गेल्या सात महिन्यांपासून वैभवशाली वनक्षेत्र प्रभारी कार्यभारावर तग धरुन आहे. एक अनुभवी कर्तव्यदक्ष अधिकारी यांची नेमणूक सुध्दा वनविभागाकडुन होत नसेल तर इतर व्याघ्रसंवर्धनाविषयी वनविभाग कोसो दुर आहे. या संवेदनशील वनक्षेत्राबाबत काही महिन्यांपूर्वी मंत्री मंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठकसुद्धा पार पडली मात्र विकासाबाबत पुढे काय झाले माहिती नाही तसेच राजकिय कारकिर्दीत वजनदार मंत्री पदे लाभलेल्या पदाधिकार्‍यांचा रहिवास असलेल्या जिल्ह्यात वाघ उपेक्षित असुन जंगलात पायाभुत सुविधा नसल्याने शेत-शिवारात भटकावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.

पाण्याच्या शोधार्थ वन्य प्राणी रस्त्यावर
दिवसोंदिवस जमिनीतील पाणी उपस्याचे प्रमाण वाढल्याने जंगलातील नैसर्गिक पाणीस्रोत ऐन उन्हाळ्यात कोरडेठाक होताहेत. जंगलातील उन्हाळ्यात असलेला नैसर्गिक थंडावा नामशेष होत असून उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी मांसभक्षी प्राणी केळीबागेत आसरा शोधत भटकत आहे. अवैध वनचराईमुळे तृणभक्षक वन्यप्राणी अन्नपाण्याच्या शोधात शेत-शिवाराची वाट धरताहेत. यास कारणीभूत वाघांचा मुक्त संचार असलेल्या संवेदनशील जंगलात ठोस उपाययोजना नियोजनबध्द व प्रभावीपणे राबविल्या गेल्या नाही. आवश्यक तेव्हढा विकास करण्यास वनविभाग अपयशी ठरला तसेच परीसरातील लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नसल्याने आज जिल्ह्याच्या वैभवात मानाचा तुरा रोवून जिल्ह्याचे नाव देशपातळीवर नेणार्‍या पट्टेदार वाघ वणवण भटकताहेत हे दुर्दैव.