पुणे : मकरसंक्रातीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना उच्च आणि लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फीडर पिलर आणि वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरी भागासह ग्रामीण भागातही महावितरणच्या उच्च आणि लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र तसेच इतर वीजयंत्रणा अस्तित्वात आहेत. वीजवाहिन्या असलेल्या परिसरात नागरिक आणि लहान मुले पतंग उडवितात. अनेक पतंग या वीजवाहिन्यांमध्ये किंवा इतर यंत्रणेत अडकतात. वीजप्रवाह सुरू असताना वाहिन्या, रोहित्रांमध्ये अडकलेले पतंग काढण्यासाठी धोका पत्करला जातो. त्यामुळे विजेचा धक्का लागून अपघात होण्याची शक्यता आहे. याशिवाय अडकलेल्या पतंगाच्या मांज्यामुळे वीजवाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट होते. नागरिक व विशेषतः लहान मुलांनी सुरक्षित आणि मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा. पालकांनी याबाबत दक्ष राहून लहान मुलांना पतंग उडविण्याबाबत मार्गदर्शन करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.