मुंबई : मुंबईचे ज्येष्ठ क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर आणि हरियाणाचे राजिंदर गोयल या दोघा दिग्गज फिरकी गोलंदाजांना बीसीआयच्या सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने गौरविले जाणार आहे. गुणवत्ता असूनही कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी न मिळालेल्या राजिंदर गोयल तसेच पद्माकर शिवलकर या दोन डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षीक पुरस्कार सोहळ्यात ‘सी. के. नायडू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. पतौडी स्मृती व्याख्यान आणि पुरस्कार सोहळा बंगळूर येथे ८ मार्च रोजी पार पडेल.
डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांचा ठसा
शिवलकर आणि गोयल यांना भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकली नाही. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये या दोघा डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांनी आपला ठसा उमटवला होता. शिवलकर यांनी 124 प्रथमश्रेणी सामन्यांत 589 विकेट्स काढल्या. त्यांनी तब्बल 42 वेळा डावात पाच विकेट्स काढण्याची तसंच 13 वेळा सामन्यात दहा विकेट्स काढण्याची कमाल केली होती. राजिंदर गोयल यांच्या नावावर रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 637 विकेट्सचा विक्रम जमा आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजिंदर गोयल यांनी एकूण 750 विकेट्स काढल्या होत्या.
शांता रंगास्वामी यांनाही गौरविणार
बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात यंदा पहिल्यांदाच महिला क्रिकेटमधील योगदानासाठीही जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे. भारताच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांना या पुरस्काराने गौरवले जाणार आहे. ज्येष्ठ पत्रकार एन राम, क्रिकेट इतिहासकार रामचंद्र गुहा आणि भारताच्या माजी कर्णधार डायना एडलजी यांचा समावेश असलेल्या समितीनं जीवनगौरव पुरस्कारांची निवड केली आहे. बंगळुरुत होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात मुंबईचे माजी रणजीवीर दिवंगत रमाकांत देसाई आणि माजी कसोटीवीर वामन विश्वनाथ कुमार यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
इंजिनियर यांना भाषणाचा मान
पतौडी स्मृती व्याख्यान आणि पुरस्कार सोहळा बंगळूर येथे ८ मार्च रोजी पार पडेल. या सोहळ्याआधी एमएके पतौडी स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, यंदा भारताचे माजी यष्टिरक्षक फारुख इंजिनियर यांना हे व्याख्यान देण्याचा मान मिळणार आहे. सर्वात चपळ यष्टिरक्षक आणि आक्रमक फलंदाज अशी त्यांची ख्याती होती. इंजिनियर ४६ कसोटी आणि पाच एकदिवसीय सामने खेळले आहेत.