पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे

0

मुंबई: विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असते. प्रत्येक राज्यात पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यासाठी एक समिती असते. महाराष्ट्रातील या समितीच्या अध्यक्षपदी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने ही नियुक्ती केली आहे. केंद्र सरकारतर्फे दरवर्षी हे पुरस्कार; कला, साहित्य, विज्ञान, शिक्षण, उद्योग, क्रीडा, वैद्यक, सामाजिक सेवा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. याच नावांची शिफारस करण्यासंदर्भातील काम या समितीच्या माध्यमातून केले जाते. यंदा या समितीचे अध्यक्षपद आदित्य ठाकरेंना देण्यात आले आहे. राज्यातील समितीने केलेल्या शिफारशी केंद्र सरकारवर बंधनकारक नसते.

आदित्य ठाकरे हे पद्म पुरस्कार समितीचे अध्यक्ष असून या समितीमध्ये पाच कॅबिनेट मंत्री, दोन राज्यमंत्री, प्रधान सचिव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी अशा एकूण नऊ जणांचा समावेश आहे. यामध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री उद्योग अदिती तटकरे, राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम दत्तात्रय भरणे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. प्रधान सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी या दोघांचीही या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटवरुन या समितीमध्ये निवड झालेल्यांचे अभिनंदन केले आहे.