मुंबई : आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडीवर एकमत झाले आहे. या पार्श्वभूमीवर जागा वाटपात ५०-५० टक्क्यांचा प्रस्ताव राष्ट्रवादीने दिल्याची चर्चा प्रसार माध्यमांमध्ये होती. मात्र, राष्ट्रवादीसोबत अद्याप जागा वाटपाबाबत कोणतीही अधिकृत बैठक झालेली नाही. यामुळे ५०-५० टक्के प्रस्तावाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. आगामी निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टिने महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीपूर्वी चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीच्या प्रस्तावाच्या वृत्ताचे खंडन केले. या बैठकीला राज्यातील वरिष्ठ नेते, आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती चव्हाण यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर जागावाटपासंदर्भात कोणतीही चर्चा अद्याप झाली नसताना काही वावड्या उठत असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले.
पुढे ते म्हणाले, की ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाची ताकद जास्त त्या आधारावर जागा वाटपचा निर्णय होऊ शकतो. पण कोणताही निर्णय झालेला नसताना अशी चर्चा जन्माला घालणे यामागे कुणाची काय मानसिकता आहे हे स्पष्ट होते, असा टोला ही त्यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे. आगामी निवडणुकांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यामागे पूर्ण शक्तीनिशी कार्यकर्त्यांनी उभे राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘संख्याबळाच्या आधारावर पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरेल’ या विधानावर चव्हाण म्हणाले, की लोकसभेच्या आघाडीबाबतचा पूर्ण निर्णय अखिल भारतीय काँग्रेस समिती घेते. तसेच देश पातळीवर काय धोरण ठेवायचे याचा अधिकार ही त्या कमिटीला असल्याने यावर अधिक बोलता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.