परितेवाडीची तहान भागणार!

0

मावळ (प्रतिनिधी) – स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही मावळ तालुक्यातील परितेवाडी हे गाव मुबलक पाण्यापासून वंचित आहे. हिवाळ्यापासूनच या गावकर्‍यांची पाण्यासाठी पायपीट सुरू होते. त्यामुळे गावात शिक्षणाचा दर चांगलाच खालावलेला आहे. गावावरील हे पाणी संकट दूर करण्यासाठी इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने कंबर कसली आहे. गावकर्‍यांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी गावापासून सुमारे तीन किलोमीटर लांब असलेल्या टाटा डॅम वरून पाईप लाईन आणण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात पाईप लाईनचे काम पूर्ण होणार आहे, अशी माहिती इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा सविता राजापूरकर यांनी दिली. या कामामुळे गावातील 140 कुटुंब व 100 एकर शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळणार आहे. पाईप लाईनच्या कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी माजी अध्यक्षा जयश्री कुलकर्णी, रेखा मित्रगोत्री, मावळ विकास समितीचे बबनराव बधाळे, परितेवाडीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

शाळेची पटसंख्या कमी
परितेवाडी हे गाव पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. शेतीमध्ये देखील हंगामीच पिके घेतली जातात. पावसाळ्यानंतर येथे कसलेही उत्पादन होत नाही. त्यामुळे गावावर कायम आर्थिक संकट ओढावलेले असते. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागते. शाळेत जाण्याच्या वयात मुलांवर पाण्याची भांडी घेऊन फिरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गावातील शाळेची पटसंख्या कमी झाली आहे.

तीन महिन्यात काम पूर्ण
गावाच्या विकासाला व मुलांना शाळेपासून वंचित राहण्यासाठी केवळ पाणीच कारणीभूत असल्याने पाण्याची सोय करणे महत्त्वाचे होते. त्यासाठी इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने पुढाकार घेत पाईप लाईनचे काम हाती घेतले आहे. हे काम पुढील दोन ते तीन महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. गावात पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी आल्यानंतर गावकरी बारा महिने शेतीतील विविध पिके घेऊ शकणार आहेत. त्यामुळे गावावरील आर्थिक संकट टळेल, अशी आशा इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा सविता राजापूरकर यांनी व्यक्त केली.