‘पर्यावरणशास्त्र विद्यार्थ्यांनी जलसेवक व्हावे’

0

पुणे । पर्यावरणशास्त्र विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा, संशोधनाचा उपयोग नद्यांच्या शुद्धीकरणासाठी करावा. प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करून जलसेवक व्हावे, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी गुरुवारी केले.

जलबिरादरीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह यांच्या प्रेरणेतून तसेच वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जलबिरादरी आयोजित ‘नमामि चंद्रभागा’ जलसाक्षरता यात्रेदरम्यान विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागात ‘जलसाक्षरता’ विषयावर आयोजित विद्यार्थ्यांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आनंद पुसावळे, सुनील जोशी, नरेंद्र चुघ, प्रा. प्रभाकर देसाई, अनिल पाटील, सुहास पटवर्धन, विनोद बोधनकर, डॉ. सतीश चव्हाण, संदीप चोडणकर, व्ही.व्ही. शिंदे, एस.सी. कुमकुर, एम.टी. मेरगेवाड, उष:प्रभा पागे, शैलजा देशपांडे उपस्थित होते. याप्रसंगी विविध महाविद्यालयातील विद्यार्थांनी आपापल्या गावच्या नदीची सद्यस्थिती सांगितली. यावेळी नदी सुधारणांसाठी कार्यदल स्थापन करण्यात आले.

करमळकर म्हणाले, जलरक्षण आणि नदी शुद्धीकरण मोहिमेत विद्यापीठ आपले योगदान देईल. विनोद बोधनकर यांनी सांगरुण गावातील प्लॅस्टिक मुक्तीचा प्रयोग, तर संदीप चोडणकर यांनी पंचगंगा शुद्धीकरणाचे अनुभव सांगितला. नदीबाबतीत सजगता वाढवावी, त्यासाठी नदी आपली वाटली पाहिजे आणि निर्णय प्रक्रियेत युवा पिढीचा सहभाग वाढला पाहिजे, असे प्रतिपादन जोशी यांनी केले. डॉ. सुरेश गोसावी यांनी स्वागत केले, डॉ. प्रभाकर देसाई यांनी आभार मानले.