मुंबई – राफेल खरेदीचा व्यवहार माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना मान्य नव्हता म्हणूनच त्यांनी संरक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. यावर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी भाष्य करत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद पवारांनी केलेले विधान अयोग्य आहे अशी टीका केली आहे.
शरद पवारांनी हे विधान करण्याची गरज नव्हती. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर असे वक्तव्य करणे अयोग्य आहे. मनोहर पर्रिकर असते तर याचे उत्तर त्यांनीच दिले असते. मात्र राहुल गांधी यांनीही याआधी असेच काहीसे बोलण्याचा प्रयत्न केला होता. मृत्यूच्या 8 दिवस आधी मनोहर पर्रिकर बोलले होते. जर मला संधी मिळाली तर मोदींसाठी किमान 2 प्रचारसभा तरी घेईन कारण असा पंतप्रधान देशाला परत मिळणार नाही
कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राफेल करारावरून केंद्र सरकारवर टीका केली होती. यावेळी राफेल खरेदी व्यावहारात गैरप्रकाराची तक्रार झाली. विमानांच्या किंमती तीन वेळा बदलण्यात आल्या. हा सर्व व्यवहार तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना पटला नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि गोव्याचे मुख्यमंत्री होणे पसंत केले, असे शरद पवार म्हणाले होते.