मुंबई: ज्या माणसाने शिवसेना वाढवली, ज्यांनी महाराष्ट्रभर आपला शिवसैनिक वाढवला, आज त्यांचाच मुलगा बाळासाहेबांना विसरून पवार साहेबांचे गुणगान गात असल्याचा निशाणा भाजपा नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये टीका करत म्हटले आहे की, आज जर पवार साहेब नसते तर उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर गोट्या खेळत बसले असते.
कमी आमदार असतानाही राज्यात सरकार कसे बनवले जाऊ शकते हे मला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिकवले असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सभेत बुधवारी व्यक्त केलं होतं. उद्धव ठाकरेंच्या या विधानावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला. यावर शिवसेना काय उत्तर देते हे पाहणे औस्तूक्याचे ठरेल. भविष्यात निलेश राणे, शिवसेना यांचे वाकयुद्ध रंगणार असल्याचे जाणकार व्यक्तींकडून सांगण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सभेच्या भाषणात शरद पवार तुम्हाला कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन द्यायला शिकवतात. त्याचप्रमाणे राजकारणात शरद पवार यांनी कमीत कमी आमदार असताना देखील राज्यात सरकार स्थापन करुन चमत्कार केला. त्यामुळे जागा जास्त असल्याने पिकं सगळीकडे येणार असं म्हणू नये असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच कमीत कमी जागेत सुद्धा तुमच्यावर मात करु शकतो आणि ते करुनही दाखवल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला होता.