पहिल्या टी-२० साठी दोन्ही संघाचा कसून सराव

0

कानपूर : कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत मात दिल्यानंतर आता २० ट्वेंटी मालिकेत इंग्लंडला मात देण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. तर इंग्लंडचा संघ देखील दोन मालिका पराजित झाल्यानंतर त्वेषाने मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघांनी मंगळवारी जोरदार सराव केला. २६ जानेवारी रोजी ग्रीन पार्कमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी सोमवारीच उभय संघ कानपूरमध्ये दाखल झाले. सुरेश रैनासह ज्या भारतीय खेळाडूंची केवळ टी-२० संघात निवड झालेली आहे ते खेळाडू अद्याप येथे पोहोचलेले नाहीत.

दोन्ही संघाचे झाले जोरदार स्वागत
भारताने कसोटी मालिकेत इंग्लंडचा ४-० ने आणि वन-डे मालिकेत २-१ ने पराभव केला. हॉटेल व्यवस्थापनाने भारतीय संघाने वन-डे मालिकेत विजय मिळवल्यामुळे आनंद साजरा करण्यासाठी लॉबीमध्ये केक ठेवला होता, पण कर्णधार विराट कोहलीसह संघातील एकाही सदस्याने केक न कापता थेट रूमचा मार्ग धरला. खेळाडू दुपारी कोलकाताहून लखनौमध्ये दाखल झाले. त्यानंतर कडक सुरक्षाव्यवस्थेत विशेष बसमध्ये ३ वाजण्याच्या सुमारास कानपूरच्या हॉटेल लँडमार्कमध्ये दाखल झाले. हॉटेल व्यवस्थापनाने परंपरागत पद्धतीने खेळाडूंचे स्वागत केले. हॉटेलच्या लॉबीमध्ये महेंद्रसिंह धोनी व कोहली यांचे मोठे पोस्टर लावण्यात आले होते. इंग्लंडच्या संघाने सकाळच्या सत्रात तर भारतीय संघाने सायंकाळच्या सत्रात कसून सराव केला. सामन्याच्या पार्श्वभूमीवरग्रीन पार्क स्टेडियम आणि हॉटेल परिसरामध्ये कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.