नवी दिल्ली । अमरनाथ यात्रेकरुंवर झालेला हल्ला हा लष्कर ए तोयबाफ आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांनी संयुक्तपणे केल्याची धक्कादायक माहिती गुप्तचर यंत्रणाने गृहमंत्रालयाला दिली आहे. तसेच इस्माईल नावाच्या लष्कराच्या दहशतवाद्याच्या नेतृत्त्वात हा हल्ला झाला. यासाठी इस्माईलला दोन पाकिस्तानी दहशतवादी आणि दोन स्थानिक काश्मिरी दहशतवाद्यांची साथ होती, अशीही माहितीही पुढे आली आहे. लष्कर ए तोयबाचा इस्माईल हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचीही बाब या रिपोर्टमध्ये उघड झाली आहे.
दरम्यान, या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व वरिष्ठ अधिकारी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. उत्तर प्रदेशात कावड यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दहशतवाद्यांना स्थानिक हिजबुलच्या दहशतवाद्यांनी वाहतुकीसाठी मदत केली. बसवर गोळीबार करुन ती बस ताब्यात घेण्याचा डाव दहशतवाद्यांचा होता.
दहशतवादी हल्ल्यात 7 भाविकांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 7 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 19 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. तर इतर भाविक गुजरातमधील वलसाडचे आहेत. रात्री सव्वा आठच्या सुमारास बालटाल इथून जम्मूच्या दिशेने जाणार्या अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. यात्रेकरूंनी बस थांबवल्याने ही बस सुरक्षारक्षकांच्या ताफ्यातून मागे राहिली. हीच संधी साधत दहशतवाद्यांनी हल्ला केला. दरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गृहमंत्रालयाची तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान गृहमंत्रालयाची टीम आज अनंतनागला जाऊन अमरनाथ यात्रेतील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करणार आहे.
तीन दिवसांचे राशन-पाणी
हा हल्ला पूर्व नियोजित व पूर्ण तयारीनिशी करण्यात आला. हा हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी तीन दिवसांचे अन्न, खाद्यपदार्थांची तजवीज आधीच केली होती. अमरनाथ यात्रेकरुंच्या एकट्या बसला घेरण्याचा त्यांचा डाव होता. तो डाव त्यांनी सोमवारी रात्री साधला.