पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांची माहिती ; कलम 144 नुसार कारवाईच्या सुचना
जळगाव- कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनातर्फे राज्यभरात पाच पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली असून त्यानुसार जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातही पाच पेक्षा अधिक नागरिक एकत्र येण्यास मनाई असून रविवारी मध्यरात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहेत. पाच पेक्षा अधिक नागरिक एकत्र आढळून आल्यास कलम 144 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी जनशक्तिशी बोलतांना दिली.
कोरोना प्रसार वेगाने होत असून गुणाकार पद्धतीने कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेवून राज्यशासनातर्फे पाच पेक्षा अधिक नागरिक एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमिवर जळगाव जिल्ह्यात जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमिवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हा बंदोबस्त आहे तसाच राहणार असून जमावबंदीचे आदेश लागू आहेत. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याच्या सुचना तसेच आदेश कर्मचार्यांना देण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी सांगितले. जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कलम 144 नुसार कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले.
जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमिवर रविवारी कर्मचार्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यानुसार पाच पेक्षा अधिक नागरिक जमण्यास मनाई असल्याच्या राज्य शासनाच्या निर्णयानुसार शहरासह जिल्ह्यात चौका चौकांमध्ये आहे तसाच बंदोबस्त कायम राहणार आहे. कर्मचार्यांना अलर्ट राहण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. पाच पेक्षा अधिक नागरिक एकत्र जमलेले दिसून आल्यास कलम 144 नुसार कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी सहकार्य करावे. – डॉ. पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक, जळगाव