पाणी पुरवठ्याचा वेळापत्रक आजपासून जाहीर; रात्री-अपरात्री कधीही होईल पाणीपुरवठा

0

पुणे- शहरातील सर्व भागाला पुरेशा दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज पाच तास पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी आज २९ ऑक्टोबरपासून होणार असून, त्यानुसार काही भागात रात्री-अपरात्री केव्हाही पाणीपुरवठा होणार आहे. पालिकेला पुरेसे पाणी उपलब्ध होत असतानाही विस्कळीत पाणीपुरवठा, पाणी वितरणाची सदोष यंत्रणा आणि नव्या वेळापत्रकाच्या चाचणीवेळी पुढे आलेल्या तक्रारींच्या पाश्र्वभूमीवर नव्या वेळापत्रकानुसार तरी शहरात नियमित पाणीपुरवठा होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खडकवासला साखळी प्रकल्पातील धरणामध्ये गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ात कपात करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार शहरासाठी प्रतीदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी घेण्याऐवजी ११५० दशलक्ष लिटर पाणी घ्यावे, अशी सूचना महापालिकेला करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाकडून कमी पाणी मिळणार असतानाही पर्वती ते लष्कर जलकेंद्रादरम्यानच्या नव्या बंद जलवाहिनीतून प्रतीदिन १५० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे पाणीपुरवठय़ावर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि प्रशासनाकडून नव्या वेळापत्रकाचे नियोजनात करण्यात आला होता.

नव्या वेळापत्रकाची अंलमबजावणी म्हणजे पाणीकपात नाही. पाणीपुरवठय़ाच्या तक्रारींचे प्रमाण वाढल्यामुळे प्रत्येक भागाला पुरेशा दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक भागाला पाच तास पाणीपुरवठा होईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी जाहीर केले होते. नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी करताना विभाग बदलण्यात आले आहेत. यापूर्वी जुन्या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा करताना पाण्यासंदर्भात असंख्य तक्रारी येत होत्या.

जलसंपदा विभागाकडून पुरेसे पाणी मिळत असतानाही सदोष यंत्रणेमुळे सर्व भागाला नियमित पाणीपुरवठा करण्यास प्रशासनाला अपयश आले होते. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून नव्या वेळापत्रकाची चाचणी प्रशासनाकडून घेण्यात आली. कोथरूड, कर्वेनगर, औंध, बाणेर, पाषाण, सिंहगड रस्ता, सहकानगर, पद्मावती, पर्वती, शहराचा मध्यवर्ती भागातील पेठासह उपनगरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे नव्या वेळापत्रकाच्या अंमलबजावणी बाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. सोमवारपासून काही भागाला रात्री, मध्यरात्री तसेच पहाटेही पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठय़ाच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे.