पुणे – शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीत गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या पोलीस कुटुंबीयांनी आज रास्ता रोको आंदोलन करत पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी मोर्चा काढला. टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
खडकवासला कालवा फुटीनंतर शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे़ त्यामुळे शहरातील हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत़ शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये अगोदरपासून अपुरा पाणीपुरवठा होत होता़ त्यात गेल्या तीन दिवसांपासून जलसंपदा विभागाने पालिकेचे पंप बंद केल्याने एसएनडीटी टाकीतून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने शिवाजीनगर, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी या परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये तर अत्यंत कमी दाबाने गेल्या ४ दिवसांपासून पाणी येत आहे. अनेक इमारतीमध्ये तर पाणीच आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलीस कुटुंब रस्त्यावर आले.