पारंपारिक ज्ञानाला नवनिर्मितीची जोड द्या : डॉ. फुरकन कमार

0

पुणे । अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना फक्त पुस्तकी ज्ञान घेऊन पदवी संपादीत करण्यापेक्षा नवनिर्मिती करणे गरजेचे आहे. पारंपारिक ज्ञानाला नवनिर्मितीची जोड दिल्यास जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो, असे मत भारतीय विद्यापीठ संघाचे महासचिव डॉ. फुरकन कमार यांनी सोमवारी व्यक्त केले.

राजबाग, लोणी-काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. साऊथ आशियाच्या ग्लोबल सप्लाय चेनच्या मनुष्यबळ विभागाचे संचालक कंदी सिताराम व इकोले सॉलिटिअरचे संस्थापक संचालक मिनोचर पटेल हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. प्रा. पी. बी. जोशी, प्रा. शरद्चंद्र दराडे-पाटील, उषा विश्वनाथ कराड, प्रा. डॉ. सुनिल राय, डॉ. सुनिल कराड आदी मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

दर्जेदार शिक्षण देणारी महाविद्यायेच टिकणार
भारतात उच्च शिक्षण देणार्‍या संस्था मोठ्याप्रमाणावर आहेत. 800च्या आसपास विद्यापीठे असून 40 हजारांहून अधिक महाविद्यालये आहेत. परंतु काही महाविद्यालयांत गुणवत्ता नाही व काहींकडे अनुभविक प्राध्यापक नाहीत. तर काही महाविद्यालयांकडे पायाभूत सुविधा नाहीत. त्यामुळे इंजिनिअरिंग व मेडिकलमधील जागा रिकाम्या आहेत. भविष्यात गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देणारी महाविद्यालयेच टिकू शकतील, असे डॉ. फुरकन कमार यांनी सांगितले.

नवनवीन कल्पनेचा वापर करा
शिक्षण घेताना पुस्तकी ज्ञान तर मिळवाच, परंतू त्याबरोबर खेळ, सामाजिक बांधिलकी या ही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. आज तंत्रज्ञानाची झपाट्याने वाढ होत आहे. ते तंत्रज्ञानही आत्मसात करून ज्ञान वाढविण्याची आवश्यकता आहे. नवनवीन कल्पनेचा वापर करून छोटे छोटे प्रकल्प तयार करणे गरजेचे आहे. त्यातूनच आपला सर्वांगीण विकास होईल, असा विश्‍वास कंदी सिताराम यांनी यावेळी व्यक्त केला.

महापुरुषांच्या चरित्राचा अभ्यास करा
चारित्र्य, शिस्त आणि स्वच्छता या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. विज्ञान, अध्यात्म आणि तंत्रज्ञानाची जोड देऊन विद्यार्थी घडविण्याचे काम या विद्यापीठामार्फत केले जात आहे. भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वज्ञान आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाबरोबरच थोर महापुरूष, संत व तत्त्वज्ञान्यांच्या चरित्राचा अभ्यास करावा, असे डॉ. विश्वनाथ कराड यांनी सांगितले. डॉ. सुनिल राय यांनी प्रास्ताविक केले. प्रा. स्वप्निल शिरसाट व प्रा. पायल शहा यांनी सूत्रसंचालन केले.