मुंबई – पालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प खात्याद्वारे गुंदवली ते भांडूप संकुल या जलबोगद्यावर 8 हजार किलो वजनाची व 9 हजार 680 आटे असणारी प्रचंड मोठी झडप कापूरबावडी येथे बसवण्याचे काम हाती घेतले असून, 12.50 फूट व्यास असणारी ही झडप केवळ मुंबई पालिकेच्या इतिहासातच नव्हे, तर देशाच्या जलवितरण व्यवस्थेच्या इतिहासातदेखील पहिल्यांदाच बसवण्यात येत आहे. या झडपेमुळे गुंदवली ते भांडूप संकुल हा 15.20 किलोमीटर लांबीचा जलबोगदा गुंदवली ते कापुरबावडी अथवा कापूरबावडी ते भांडुप अशा दोन भागांमध्ये विभागणे तांत्रिकदृष्ट्या आता शक्य झाले आहे. यामुळे या दोन भागांपैकी कुठल्याही एका भागात परिरक्षणाचे काम उद्भवल्यास दुसरा भाग कार्यान्वित ठेवून पाणीपुरवठा सुरू ठेवणे शक्य होणार आहे, अशी माहिती पालिका उपायुक्त रमेश बांबळे यांनी दिली.
गुंदवली येथून भांडूप संकुल येथे पाणी वाहून नेण्यासाठी पालिकेने डिसेंबर-2016 मध्ये नवा जलबोगदा कार्यान्वित केला आहे. या जलबोगद्यामध्ये परिरक्षणाचे एखादे काम उद्भवल्यास 18 फूट व्यासाचा 5.50 मीटर व 15.20 किलोमीटर लांबीचा हा जलबोगदा पूर्णपणे पाणीविरहित करणे आतापर्यंत आवश्यक होते. यामुळे गुंदवली येथून भांडुप संकुल येथे करावयाच्या दैनंदिन पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता होती. पालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प या खात्याद्वारे या जलबोगद्यामध्ये कापूरबावडी येथे बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या झडपेमुळे भविष्यात परिरक्षण उद्भवल्यास त्यादरम्यान जलबोगद्याचा निम्मा भाग सुरू ठेवणे व आधीच्या जलवाहिनीचा वापर करून पाण्याचे वहन करणे शक्य होणार आहे. ज्यामुळे साहजिकच दैनंदिन जलवितरण व्यवस्था कमीतकमी परिणाम होऊन सुरळीत पद्धतीने सुरू ठेवणे शक्य होणार आहे. 8 हजार किलो वजनाची झडप बसवण्यासाठी 12 हजार किलो वजनाची क्रेन वापरण्यात आली आहे. या झडपेला 9 हजार 680 आटे असून ही झडप उघडण्यासाठी 9 तास, तर बंद करण्यासाठी 9 तास एवढा वेळ लागणार आहे. पालिकेच्या जलबोगद्यामध्ये पाण्याचा दाब हा साधारणपणे प्रत्येक चौरस सेंटीमीटरला 16 किलो एवढा असून असतो. प्रत्येक चौरस सेंमीला 24 किलो एवढी क्षमता असणारी झडप जलबोगद्यात बसवण्यात आली आहे. या बटरफ्लाय झडपेची एकूण किंमत 9 कोटी रुपये एवढी आहे, अशीही माहिती उपायुक्त बांबळे यांनी दिली.
येत्या 9 एप्रिलपासून 10 टक्के पाणीकपात पालिका मागे घेणार – उपायुक्त रमेश बांबळे
कापूरबावडी येथे बटरफ्लाय झडप बसवण्याचे काम गेल्या 25 मार्चपासून हाती घेण्यात आले आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, ते पूर्ण झाल्यानंतर सध्या तात्पुरत्या स्वरूपात लागू करण्यात आलेली 10 टक्के पाणी कपात 9 एप्रिलपासून मागे घेण्यात येईल, असेही पालिका उपायुक्त रमेश बांबळे यांनी सांगितले आहे.