पालिकेचा विसर्जन स्थळी सुरक्षेचा दावा फसवा

0

कल्याण : महापालिका प्रशासनाकडून पालिका क्षेत्रातील ५२ गणपती विसर्जनस्थळी लाईफ गार्ड, स्वयंसेवक, अग्निशमन अधिकारी, रबर बोटी, तराफे यांची सुविधा केली जात असल्याचा दावा करण्यात येतो मात्र त्यानंतर ही पालिकेची विसर्जन स्थळी असलेली आपत्कालीन यंत्रणा सक्षम नसल्यामुळे अपघात घडत असल्याचा आरोप करत लोक्प्रतीनिधीनी पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल स्थायी समितीच्या बैठकीत केली. याबाबत स्थायी समिती सभापतीनी आपत्कालीन व्यवस्था कागदावर न करता प्रत्यक्षात त्याची अमलबजावणी करा तसेच नेमण्यात येणाऱ्या कर्मचारी आणी स्वयंसेवकाची फोटोसह माहिती सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

खाडीच्या पाण्यात उतरणाऱ्या तरुणांना त्वचा रोगासारखे गंभीर आजाराचा सामना करावा लागतो मात्र त्याना या मदतीचा मोबदला देखील मिळत नसल्याचे सांगत नगरसेवक विकास म्हात्रे यांनी यंदा विसर्जन स्थळी पुरविल्या जाणाऱ्या सुरक्षेची माहिती देण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे करत प्रशासनाच्या सुरक्षेची व्यवस्था केवळ कागदावर असली तरी प्रत्यक्षात नसल्याचे उघड केले. यानंतर अग्निशमन विभागाने गेल्यावर्षी स्वयंसेवक आणि बोटी कमी होत्या मात्र नेमण्यात आलेल्या स्वयंसेवक पोहणारे होते. मात्र होमगार्डना पोहता येत नसल्याचे मान्य करत यंदा आवश्यक सामग्री खरेदी करण्यात आली असून लवकरच तीचा अग्निशमन विभागाकडून वापर सुरु केला जाणार असल्यामुळे यंदा तशी परिस्थिती उद्भवणार नसल्याचे स्पष्ट केले.

सुरक्षितता कागदावरच
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेकडून पालिका क्षेत्रातील 52 गणेश विसर्जन स्थळांवर लाईफ गार्ड, स्वयंसेवक, अग्निशमन अधिकाऱ्यांसह रबर बोटी, तराफे यांची सुविधा करण्यात आल्याचा दावा करण्यात येतो मात्र गेल्यावर्षी डोंबिवली पश्चिमेकडील गणेश विसर्जन घाटावर विसर्जनासाठी गर्दी झालेली असताना विसर्जनासाठी पाण्यात उतरलेले तरून पाण्याच्या प्रवाहां बरोबर वाहून जाण्याची घटना घडली होती. मात्र हे तरुण पोहणारे असल्यामुळे कोणतीही जीवितहानी घडली नसली तरी विसर्जन स्थळावर नेमले जाणारे स्वयंसेवक आणि होमगार्ड यांना पोहता येत नसल्यामुळे स्थानिक मुलाना पुराच्या पाण्यात उड्या मारून बाहेर काढावे लागते. अनेकदा घाटावर विजेची देखील सुविधा नसल्यामुळे अंधारात चाचपडावे लागते. तसेच पाण्यात उतरणाऱ्या तरुणांना लाईफ जॅकेटसह सुरक्षेची साधने पुरविली जात नसून सुरक्षेसाठी देण्यात आलेल्या बोटी देखील कागदावर असतात.

विसर्जनस्थळी नेमले जाणार १०० स्वयंसेवक
यंदा १०० स्वयंसेवक नेमले जाणार असून ५२ ठिकाणी केल्या जाणाऱ्या विसर्जन स्थळी या स्वयंसेवकाची नेमणूक केली जाणार असल्याचे सांगितले मात्र यामुळे समाधान न झाल्याने नगरसेवकांनी या स्वयंसेवकाची फोटोसह नेमणुकीची माहिती प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. तसेच कोणत्या विसर्जन स्थळी किती बोटी आणि लाईफ जकेट देण्यात आली आहे याची सविस्तर माहिती देण्याचे देखील आदेश दिले आहेत. मात्र २० दिवसावर आलेल्या गणेशोत्सवा दरम्यान पालिका प्रशासनाची पुन्हा पोलखोल होऊ नये आणि नागरिकांना नाहक जीव गमवावा लागू नये अशी मागणी आता लोकप्रतिनिधीकडून होत आहे.