चाळीसगाव- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणावरून पाणी पुरवठा करत असलेल्या नगरपरिषदेची मुख्य जल वाहिनीला मोठी गळती लागली आहे. यामुळे पुन्हा एकदा या पाईप लाईनच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आज सकाळी ही बाब पालिका प्रशासनाच्या लक्षात आली तातडीने मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, विश्वास चव्हाण, पालिका पाणी पुरवठा अभियंता संजय आहिरे, कैलास आगोने, दिपक देशमुख यांच्यासह कर्मचारी यांनी गळती होत असलेल्या ठिकाणी भेट दिली. दरम्यान दुरुस्तीला ३६ तास लागणार असल्याचे नगराध्यक्ष आशालता चव्हाण यांनी जनशक्तीशी बोलतांना सांगितले.
धुळे बायपास चौकातून मालेगाव चौफुलीकडे जाताना जगदीश आग्रवाल यांच्या नियोजित मंगल कार्यालय समोर ही पाईपलाईन फुटली आहे. या दुरुस्तीसाठी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सर्व यंत्र सामुग्री व तद्याची व्यवस्था सुरू केली. त्यामुळे शहराचा नियमित पाणी पुरवठा खंडित होणार नाही असे असले तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जल वाहिनीला सकाळी लिकेज झाल्याचे समजले. हा लिकेज पालिकेच्या जलवाहिनीला झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा लिकेज आहे. त्यामुळे सर्व पाणीपुरवठा विभाग या दुरुस्तीसाठी कामाला लागला आहे, तरीही या दुरुस्तीसाठी ३६ तास लागू शकतात. नागरिकांनी घरातील पाणी जपून वापरावे.
-नगराध्यक्षा आशालता चव्हाण