मुंबई – आगामी पावसाळ्यात सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत होवू नये यासाठी मान्सूनपूर्व आराखड्याची उत्कृष्टपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले.
मान्सूनपूर्व आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष सिंह,पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, एमएमआरडीएचे आयुक्त यु.पी.एस. मदान, बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, जलसंपदा विभागाचे सचिव आर. व्ही. पानसे आदी उपस्थित होते. मान्सूनपूर्व तयारी आराखड्यांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर उत्तमरित्या होईल याकडे लक्ष द्यावे. भारतीय हवामान खात्याने पावसाचा अंदाज अचूकपणे वर्तविल्याचे आजपर्यंत दिसून येत आहे. यावर्षी समाधानकारक पावसाचा अंदाज आहे. सर्व विभागांनी आगामी पावसाच्या नियमित अंदाजानुसार तातडीच्या उपाययोजनांचे नियोजन करावे. रेल्वे आणि इतर वाहतूक मार्गांचा, दळणवळण यंत्रणेचा प्रभावीपणे उपयोग करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपत्ती आल्यानंतरच्या मदतीसाठी प्रतिसाद देण्याचा वेळ कमीतकमी कसा होईल याकडे लक्ष द्यावे, पावसाचे पाणी साठून राहू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. गावांचा संपर्क तुटू नये यासाठी संपर्क यंत्रणांचा प्रभावी उपयोग करण्यात यावा. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून येणाऱ्या पावसाळ्यात नियोजनबद्ध आपत्ती व्यवस्थापन करावे, असेही ते म्हणाले.