नवी दिल्ली । स्मार्ट शहर योजनेतील अखेरची यादी जाहीर झाली असून, यात महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड आणि अमरावती या दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. याआधी पहिल्या टप्प्यातील 20 शहरांची घोषणा केली होती. त्यात भुवनेश्वरला अव्वल स्थान देण्यात आले होते. तर तिसर्या टप्प्यात जाहीर केलेल्या या यादीत पहिल्या पाचमध्ये अमरावतीला स्थान देण्यात आले आहे, देशातील 100 स्मार्ट शहरे वसवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने स्मार्ट शहर योजना हाती घेतली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत केंद्र सरकार आता 30 शहरांचा विकास करणार आहे. या शहरांच्या नावांची घोषणा नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी केली आहे.
अमरावती 4 थ्या आणि पिंपरी चिचवड 18 व्या स्थानी
तिसर्या टप्प्यातील अखेरच्या यादीत तिरुवअनंतपुरम पहिल्या, तर महाराष्ट्रातील अमरावती चौथ्या स्थानावर आहे. तर पिंपरी – चिंचवड 18 व्या स्थानी आहे. नवा रायपूर आणि राजकोट अनुक्रमे दुसर्या आणि तिसर्या स्थानी आहेत. बिहारमधील पाटणा पाचव्या स्थानी आहे. जम्मू आणि श्रीनगर ही दोन शहरेही स्मार्ट शहर योजनेंतर्गत विकासित करण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद, अलीगढ आणि झाशी या शहरांचीही निवड करण्यात आली आहे. स्मार्ट शहर योजनेत देहरादून आणि शिमला या शहरांचाही विकास केला जाणार आहे.
ही 30 शहरे होणार स्मार्ट
तिरुवअनंतपुरम, नवा रायपूर, राजकोट, अमरावती, पाटणा, करीमनगर, मुजफ्फपूर, पुद्दूचेरी, गांधीनगर, श्रीनगर, सागर, कर्नाल, सतना, बेंगळुरु, शिमला, त्रिपूर, पिंपरी-चिंचवड, बिलासपूर, पासिघाट, जम्मू, दाहोद, तिरुनेलवेल्ली, थूठकुडी, तिरूचिरापल्ली, झाशी, आयझॉल, अलाहाबाद, अलीगढ आणि गंगटोक.