हनुमान जयंती उत्साहात साजरी
नवी सांगवी : पिंपळे गुरव येथे हनुमान जयंती व भैरवनाथ ऊरूस उत्साहात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्रींचा लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर हनुमान जन्मोत्सव व श्रींचा अभिषेक होऊन धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर सायंकाळी शाहिस्नान झाल्यानंतर गाडी, बगाड, नगरासह श्रींचे धर्मकुंडावर आगमन होऊन ग्राम प्रवेश झाला. त्यानंतर छबिना (पालखी मिरवणुक) पार पडली. ऊरूसाचे मुख्य आकर्षण म्हणजे कुस्त्यांची दंगल होती. यावर्षीही राज्यभरासह देशातील मल्लांनी येथे हजेरी लावून बक्षिसांची कमाई केली. शेवटची निर्णायक लढत मुळशी येथील साईनाथ रानवडे व पंजाबचा मंजित दलाल यांच्या झाली. साईनाथने निकाल डाव लावून मंजितवर विजय मिळविला. यावेळी कै. पांडुरंग खंडोजी जगताप यांच्या स्मरणार्थ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या तर्फे एक लाख रूपयांचे बक्षिस देण्यात आले. उपमहाराष्ट्र केसरी अक्षय शिंदे व महाराष्ट्र चॅम्पियन राजेंद्र राजमाने यांचीही लढत चुरसीची होऊन अक्षयने विजेतेपद पटकाविले.
आमदार जगताप व पोलिस पाटील जयसिंग जगताप यांच्या हस्ते आखाड्याचे पुजन करण्यात आले. तर दत्तात्रय कंद, तुकाराम जवळकर, अंबरनाथ कांबळे यांनी पंच म्हणून काम पाहिले. उत्सव समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक शंकर जगताप, उपाध्यक्ष बबनराव कदम, खजिनदार शिवाजी कदम, महेश जगताप, नवनाथ जांभुळकर, सुनील देवकर, संतोश कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी ऊरूस यशस्वी केला. ऊरूसाची सांगता रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली.