‘पीएनबी’ घोटाळा : नीरव मोदी विदेशात पळाला!

0

ईडीकडून मोदींच्या मुंबई, सूरत, दिल्लीतील कार्यालयांवर छापे

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) तब्बल 11,300 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा करणारा गुजरातचा उद्योगपती नीरव मोदी हा विदेशात फरार झाला असून, तो स्वित्झर्लंडमध्ये असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. तर, मोदी हा देश सोडून गेल्याची कुठलीही माहिती नाही, असेही केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले. मोदीसह आणखी तिघेजण फरार झाले असून, हा विजय मल्ल्या याच्यापेक्षाही मोठा घोटाळा ठरला आहे. या घोटाळ्यानंतर पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी गुरुवारी तातडीची बैठक घेतली. हा गैरव्यवहार बँकेनेच उघडकीस आणला असून, ग्राहकांचा पैसा सुरक्षित असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणाची माहिती आम्ही सीबीआय, सेबी आणि इतर सर्व सरकारी एजन्सीजना दिली आहे. तसेच, बँकेच्या 10 अधिकार्‍यांना तडकाफडकी निलंबित केले आहे, असेही मेहता यांनी सांगितले. दरम्यान, सक्तवसुली संचलनालयाने मोदी याच्या मुंबईतील कुर्ला वेस्ट, कालाघोडा, बांद्रा, लोअर परेल, सूरत, दिल्ली येथील कार्यालयावर छापे घातले व काही महत्वाचे दस्तावेज ताब्यात घेतले आहेत. मोदीविरुद्ध लूकआउट नोटीसही जारी करण्यात आली होती. दरम्यान, मोदी याने पीएनबी बँकेला पत्र लिहून पैसे परत करण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ मागितला असल्याचेही वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या घोटाळ्यामुळे शेअर बाजारात बँकेचे शेअर 10 टक्क्याने घसरले होते.

घोटाळा करणार्‍यांना सोडणार नाही!
पीएनबी ही 123 वर्षे जुनी बँक असून, या बँकेची स्थापना थोर स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांनी केली होती. ही देशातील द्वितीय क्रमांकाची सर्वात मोठी राष्ट्रीयकृत बँक आहे. या घोटाळ्यात सहभागी अधिकार्‍यांविरुद्ध बँकेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. 2011 मध्ये या घोटाळ्यास सुरुवात झाली होती. तर जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात आपणास या घोटाळ्याची माहिती मिळाली, असे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आम्ही तातडीने या घोटाळ्याची माहिती सीबीआयला दिली. 29 जानेवारीरोजीच सीबीआयला सविस्तर कळविण्यात आले होते. तर 30 जानेवारीरोजी याबाबत पहिली तक्रार पोलिसांत करण्यात आली होती. त्यामुळे ज्यांनी हा घोटाळा केला त्यांना अजिबात सोडले जाणार नाही. या संकटातून बाहेर पडण्यासाठी बँक सक्षम आहे, असेही मेहता म्हणाले. प्रसारमाध्यमांनी अत्यंत संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळावे. आम्ही कोणत्याही प्रकारे चुकीचे काम होऊ देणार नाही. ग्राहकांचा पैसा सुरक्षीत आहे. तसेच, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जात आहे, असेही मेहता यांनी सांगितले. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माहितीनुसार, पीएनबीचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन जवळपास 36 हजार 566 कोटी रुपये इतके आहे. त्यांनी जवळपास 4.50 लाख कोटी रुपये बाजारपेठेत कर्जवाटप केले आहे. बँकेतील घोटाळ्याच्या वृत्तानंतर गुंतवणूकदारांना एका दिवसात जवळपास 3 हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.
ठळक बाबी
1. सुमारे 11,427 कोटी रुपये संबंधितांनी विदेशात राहून वळविले
2. विदेशात पेमेंट करताना स्विफ्ट खात्याचा वापर करण्यात आला
3. आयातीचा व्यवहार दाखविला, परंतु प्रत्यक्षात तो झालाच नाही
4. नीरव मोदीसह तिघांनी 3 कंपन्यांद्वारे केला हा घोटाळा
5. बँकेतील आधीच्या 280 कोटींच्या घोटाळ्यातही मोदीचे नाव
6. पीएनबीसह अलहाबाद, युनियन बँक, अ‍ॅक्सिस बँकही संकटात
7. पीएनबी महाघोटाळ्याने मोदी सरकार अडचणीत
8. विरोधकांनी मोदी सरकारला घेरले
9. दावोसमध्ये पंतप्रधानांसमवेत नीरव मोदीचा फोटो
10. मोदीचे उद्योजगतासह बॉलिवूडसह हॉलिवूडशी संबंध
नीरव मोदीचे केंद्र सरकारशी कनेक्शन
सार्वजनिक क्षेत्रातील दुसर्‍या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत 11,500 कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याने देशातील बँकींगक्षेत्र हादरून गेले असून, बँकेच्या ग्राहकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. पीएनबीच्या घोटाळ्याप्रकरणी अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदीच्या देशभरातील मालमत्तांवर ईडीच्या अधिकार्‍यांनी गुरूवारी छापे मारले. तर सीबीआयने नीरव मोदीच्या मुंबईतील घराला सील ठोकले. दरम्यान, या महाघोटाळ्याचे मोदी सरकारशी कनेक्शन असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच पंजाब नॅशनल बँकेने नीरव मोदी आणि इतर काही जणांविरोधात 4.4 कोटी डॉलरच्या घोटाळ्याप्रकरणी तक्रार नोंदवली होती. ही तक्रार दाखल होण्याच्या आठवडाभरापूर्वीच नीरव मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असल्याचे समोर आले आहे. गेल्या महिन्यात दावोस येथील आर्थिक परिषदेला हजेरी लावली होती. भारतात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी यावेळी पंतप्रधानांसोबत नेहमीप्रमाणे राजकारणी आणि उद्योगपतींचे शिष्टमंडळही दावोसला गेले होते. या शिष्टमंडळात नीरव मोदी याचाही समावेश होता. नीरव मोदीबद्दल अनेक खळबळजनक माहिती आता पुढे येऊ लागली असून, त्याचे बॉलिवूडसह हॉलिवूड आणि उद्योगजगतातील मोठ्या असामींशी संबंध आहेत.
काँग्रेसचे मोदी सरकारवर गंभीर आरोप
पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) महाघोटाळा उघडकीस आल्यानंतर राजधानी दिल्लीत राजकारणाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारलाच या महाघोटाळ्यात आरोपीच्या पिंजर्‍या उभे केले. बनावट लेटर ऑफ अँडरस्टॅण्डिंगच्या आधारे बँक यंत्रणांची फसवणूक कशी झाली?, 26 जुलै 2016 मध्ये पंतप्रधान कार्यालयाला माहिती दिली. त्यावर कारवाई का केली नाही?, 29 जानेवारी 2018 रोजी सीबीआयला पीएनबीच्या वरिष्ठ अधिकार्‍याने पत्र लिहून नीरव मोदींवर कारवाई करण्याची मागणी केली. मोदी देश सोडून फरार होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली. तरीही नीरव मोदी पळाला कसा?, नीरव मोदीला सरकारमधून कुणाचे अभय आहे? त्याने संपूर्ण यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक केलीच कशी?, मोदी सरकार असताना नीरव मोदींनी घोटाळा करण्याचे धाडस कसे केले?, असा प्रश्‍नांचा भडीमार काँग्रेसने केला आहे. देशाचा पैसा घ्या आणि पळून जा हेच या सरकारचे चारित्र्य बनले आहे. पंतप्रधान कार्यालयाने नीरव मोदींसदर्भातली कागदपत्रे ताब्यात घेतली आणि कंपनी रजिस्ट्रारकडे पुढील कारवाईसाठी पाठवली, पण कारवाई झाली नाही, अशी टीका काँग्रेसने पत्रकार परिषदेत केली.
कुणकुण लागल्यानेच देश सोडला
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी 23 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी यांनी या शिष्टमंडळासोबत काढलेला फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यापूर्वी 2016 मध्येही नीरव मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यासोबत दावोसच्या आर्थिक परिषदेला हजेरी लावली होती. नीरव मोदींच्या या भाजप कनेक्शनमुळे सत्ताधारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. पंजाब नॅशलन बँकेकडून 31 जानेवारीला नीरव मोदींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यापूर्वीच्या आठवड्यात नीरव मोदी दावोस परिषदेत होते. नीरव मोदींना हा घोटाळा उघडकीला येण्याची कुणकुण लागल्यामुळेच त्यांनी गेल्या आठवड्यातच देश सोडल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मोदी सरकारने याविषयी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी सीताराम येचुरी यांनी केली आहे.
बँकेच्या अधिकार्‍यांनी पदाचा गैरवापर केला
सीबीआयने नीरव मोदी, त्यांची पत्नी अमि, भाऊ निशाल आणि आणखी एका नातेवाईकावर 31 जानेवारीला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पंजाब नॅशनल बँकेची 280 कोटी रुपयांची फसवणुक केल्याबद्दल सीबीआय कारवाई करत आहे. गुन्हेगारी कट रचणे आणि भ्रष्टाचारविरोधी कायद्यातील कलमांतर्गत सध्या मोदी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 2017 सालापर्यंत पंजाब नॅशनल बँकेत उपव्यवस्थापक पदावर काम करणार्‍या गोकुळनाथ शेट्टी आणि मनोज खरात या अधिकार्‍यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत 280 कोटी रुपये किमतीची आठ लेटर्स ऑफ अंडरस्टॅण्डिंग नीरव मोदी याच्या कंपनीच्या नावे जारी केली. आपल्या निवृत्तीला केवळ 3 महिने शिल्लक असताना शेट्टी यांनी हा प्रकार केल्यामुळे, सीबीआय या प्रकरणात शेट्टींची कसून चौकशी करणार आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये, बँकेच्या काही अधिकार्‍यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत नीरव मोदी याच्या कंपनीला फायदा होईल अशी कामे केली. यातून पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 280 कोटी रुपयांचा तोटा झाला.
सरकारची छत्रछाया
नीरव मोदीने भारताला लुटण्याचे तंत्र शिकवले आहे. आधी पंतप्रधानांची गळा भेट घ्या. दावोसमध्ये त्यांच्यासोबत रहा आणि देशाचे 12 हजार कोटी घेऊन मल्ल्यासारखे फरार व्हा. या प्रकरणात मोदी सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. सरकारच्या छत्रछायेत घोटाळा होत आहे.
-राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष
आम्हीच घोटाळा पकडला : भाजप 
दरम्यान, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री एस. पी. शुक्ला यांनी हा घोटाळा आम्हीच पकडल्याचा दावा केला आहे. 2011 मध्ये आमचे सरकार नव्हते. काँग्रेस आज आरोप करत आहे. मग 2011 ते 2014 पर्यंत काँग्रेस झोपली होती काय? असा सवाल करतानाच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शुक्ला यांनी केली. सध्याचे सरकार प्रत्येक समस्येवर कठोर पावले उचलत आहे. काँग्रेसचे सरकार घोटाळ्यांचे सरकार होते आणि त्यांनीच घोटाळेबाजांना अभय दिल्याचा आरोप शुक्ला यांनी केला.