आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रियेवर परिणाम : बससेवेवर परिणाम होण्याची शक्यता
पुणे : पुणे परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) विविध सुट्टे भाग खरेदी करण्यासाठीच्या निविदा प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे. आचारसंहितेचा कालावधी दोन महिन्यांहून अधिक असल्याने खरेदी न झाल्यास पीएमपीच्या बससेवेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रक्रियेला आचारसंहितेतून वगळण्याची विनंती पीएमपी प्रशासनाने निवडणूक अधिकार्यांकडे केली.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 10 मार्च रोजी लागू झाली असून ती 27 मेपर्यंत लागू असणार आहे. या कालावधीत कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. तसेच विविध विकासकामे, इतर कामांसाठी नवीन निविदा प्रक्रियाही राबविता येत नाही. पीएमपी बसला सातत्याने टायर, ऑईल, काचा यांसह विविध प्रकारच्या सुट्ट्या भागांची आवश्यकता असते. त्यासाठी टप्याटप्याने निविदा प्रक्रिया राबवून खरेदी केली जाते. ही प्रक्रिया वर्षभर सुरू असते. आवश्यकतेनुसार साहित्य खरेदी केले जाते. मात्र, आता आचारसंहितेमुळे नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यास बंधने आली आहेत. त्यामुळे प्रशासनाला निविदा काढता येत नाहीत. परिणामी, टायर, कुलंट, ऑईल व अन्य काही सुट्टया भागांची खरेदी थांबली आहे.
निवडणूक कार्यालयाशी पत्रव्यवहार
आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया राबवायची की नाही याबाबत निवडणूक कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आचारसंहिता दोन महिने असल्याने या कालावधीत खरेदी न झाल्यास अडचणी येऊ शकतात. सध्या सुट्ट्या भागांची कोणतीही अडचण नाही. मुंबईतील बेस्ट प्रशासनानेही पीएमपीकडे खरेदी प्रक्रिया राबविण्याबाबत विचारणा केली आहे, असे सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांनी याविषयी माहिती देताना सांगितले.
पीएमपीला सवलत?
वेळेवर सुट्टे भाग मिळत नसल्याने पीएमपीच्या काही बस आगारातून बाहेर काढणे शक्य होत नाही. त्यातच आता आचारसंहितेच्या काळात खरेदी प्रक्रिया रखडल्यास बससेवेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बससेवा अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्याने सुट्टया भागांची खरेदी प्रक्रिया आचारसंहितेतून वगळली जाईल. याबाबत निवडणूक कार्यालयाकडून पीएमपीला सवलत दिली जाईल. त्यामुळे बससेवेवर परिणाम होणार नाही, असे एका अधिकार्याने सांगितले.