नवी दिल्ली : पाक सरकारकडून होणार्या अन्यायामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील जनता प्रचंड नाराज आहेत. या नाराजीतूनच हजारो लोक जम्मू-काश्मीरमधील जंदालीत रॅली काढून रस्त्यावर उतरले होते. त्यात तरुणांची संख्या लक्षणीय होती. रॅलीत सहभागी तरुणांनी पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवे आहे, अशी मागणी करत पाकिस्तानविरोधात घोषणाबाजीही केली. याआधीही अशाप्रकारे येथील जनतेने रोष व्यक्त केला आहे.
सैन्यबळाचा वापर करून गळचेपी
पाकिस्तान सरकारकडून होणारे अत्याचार आणि गळचेपीविरोधात विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी ही रॅली काढली होती. पाकिस्तान सरकार केवळ अन्यायच करत नाही तर गळचेपी करण्याचे कामही करत आहे. पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तहेर संघटनांनी मातृभूमीला दहशतवाद्यांचा अड्डा केला आहे. सैन्यबळाचा वापर करून येथील जनतेची गळचेपी करण्याचे काम पाकिस्तान सरकार करत आहे. आमचे हक्क द्यावेत आणि आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.