पुन्हा सर्जिकल स्ट्राइकची तयारी

0

नवी दिल्ली । पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या दहशतवादी कारवायांना लगाम घालण्यासाठी भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करू शकते. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत पाकला इशारा दिला. सरकार दहशतवाद आणि पाकिस्तानकडून सीमेवर होत असलेल्या गोळीबाराला उत्तर देण्यासाठी काही निर्णायक पाऊल उचलेल, असे त्यांनी म्हटले. जेव्हा आम्ही सर्जिकल स्ट्राइक केले, तेव्हा आम्ही माध्यमांना सांगितले होते का? आम्ही ऑपरेशन झाल्यानंतर त्याचा गौप्यस्फोट केला. आम्ही जरूर काहीतरी निर्णायक करू. पण काय करणार हे मला तुम्हाला सांगता येणार नाही. सुरक्षा दले तेच करतील जे योग्य आहे. याचे परिणाम तुम्हाला दिसतीलच, असे त्यांनी आत्मविश्‍वासाने सांगितले.

गुप्तचर संस्थाकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या सीमेवर 15 दहशतवादी शिबिरे आणि 48 लाँचपॅड सक्रिय आहेत. त्याचबरोबर सीमारेषेजवळ 4 ते 5 बॅट कॅम्पही सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एलओसीवर 48 शिबिरे सक्रिय आहेत. सीमेजवळील लाँचपॅडमध्ये सुमारे 350 दहशतवादी हे घुसखोरीसाठी सज्ज असल्याचे समजते. पुंछ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करताना केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी पाकिस्तानच्या या कृत्याचा सर्जिकल स्ट्राइक करून भारत योग्य उत्तर देईल, असा इशारा दिला होता. ‘आता हे अति झाले आहे. दरवेळेप्रमाणे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. दहशतवाद संपवायचा असेल तर त्याला योग्य उत्तर दिलेच पाहिजे. यासाठी सर्जिकल स्ट्राइकचीच गरज आहे. दहशतवादाशी निपटण्यासाठी यापेक्षा चांगला उपाय नाही. सरकार दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई करेल,’ असे त्यांनी म्हटले होते.