दापोडी झोपडपट्टीतील घरांचे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत होणार पुनर्वसन
प्रकल्प रद्द करण्याची मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
पिंपरी : दापोडी झोपडपट्टीतील घरांचे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पुनर्वसन करण्याच्या विकास प्रकल्पाच्या विरोधात जयभीमनगर, लिंबोरे वस्ती, सिद्धार्थनगर येथील नागरिकांनी शनिवारी पिंपरीत निषेध मोर्चा काढला. प्रकल्पाच्या विरोधात त्यांनी आंदोलन केले. दरम्यान, दापोडी येथील झोपडपट्ट्यांसाठी होत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. तर काही नागरिकांच्या शिष्टमंडळाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे नागरिक या प्रकल्पासाठी खुश नाहीत. तर त्यांचा रोषच दिसून येत आहे.
हे देखील वाचा
प्रकल्पाची जनतेची दिशाभूल
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात शनिवारी आंदोलन करण्यात आले. यामध्ये स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वर्षानुवर्षे स्वतःच्या नावाने सातबारा व घरपट्टी भरत असलेल्या जयभीमनगर येथील नागरिकांच्या जागेवर झोपडपट्टीचे आरक्षण टाकून पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातून दिशाभूल व फसवणूक होत असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली आहे. या पुनर्वसन प्रकल्पास त्यांनी विरोध दर्शविला आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतला जात असल्याने नागरिकांचा विरोध होत आहे.
नागरिकांना आर्थिक झळ
येथील नागरिक अनेक वर्षांपासून येथे स्थायिक असून, अनेक घरमालकांच्या एक ते चार गुंठ्यांपेक्षा जास्त जागांचा मालकी हक्क आहे. यावर अनेकांची दुमजली घरे उभारली आहेत. काहींची जास्त चटई क्षेत्र असलेली घरे असून, त्यांना सरकारकडून केवळ 269 चौरस फूट असलेली घरे देऊन विकासाच्या नावाखाली मोठी आर्थिक झळ सोसावी लागणार आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी पुनर्वसन प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.