पूर्व मुक्त मार्गाच्या बोगद्यातील केबल जळीतप्रकरणी गुन्हा

0

मुंबई । चेंबूर ते दक्षिण मुंबई यांना जोडणार्‍या पूर्व मुक्त मार्गावरील पांजरापोळ परिसरात 800 मीटर लांबीचा मोठा बोगदा असून, या बोगद्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन बोगद्यामध्ये महापालिकेद्वारे विद्युत दिव्यांची व्यवस्था आहे. मात्र, काही समाज-विघातक प्रवृत्तींनी विद्युत दिवे चोरल्याने आणि तेथील विद्युत केबल जाळण्यात आल्याने बोगद्यातील प्रकाश व्यवस्था गेले काही दिवस बंद होती. याप्रकरणी महापालिकेच्या ’एम पूर्व’ विभाग कार्यालयाद्वारे पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे तसेच बोगद्यातील अंधारामुळे वाहनचालकांना होणार्‍या संभाव्य त्रासाची शक्यता लक्षात घेऊन प्रकाश व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी महापालिकेद्वारे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

800 मीटर लांबीचा बोगदा
महापालिकेच्या ’एम पूर्व’ विभागाच्या हद्दीत पांजरापोळ परिसरात पूर्वमुक्त मार्गाचा काही भाग येतो. याच भागातील पूर्व मुक्त मार्गावर सुमारे 800 मीटर लांबीचा व स्वतंत्र दुहेरी मार्गिका असणार वाहतूक बोगदादेखील आहे. या बोगद्यातील प्रकाश व्यवस्थेसाठी महापालिकेद्वारे विद्युत दिवे आणि विद्युत केबल बसवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी काही समाजकंटकांनी बोगद्यातील केबल पूर्णपणे जाळण्यात आली तसेच विद्युत दिवे आणि फिटिंग्ज चोरण्यात आल्या. याबाबत महापालिकेद्वारे पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या बोगद्यात यापूर्वीदेखील अशा घटना घडल्या होत्या.

वाहनचालकांच्या सुविधेच्या व सुरक्षेच्या दृष्टीने बोगद्यातील प्रकाश व्यवस्था पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत सर्वप्रथम जनित्र-संच बसवून तात्पुरत्या स्वरूपात प्रकाश व्यवस्था कार्यान्वित केली आहे तसेच नियमित स्वरूपातील प्रकाश व्यवस्थेसाठी विद्युत केबल व विद्युत दिवे बसविण्याचे कामदेखील हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी बोगद्यात केवळ ’हाय पावर सोडिअम वेपर’ या प्रकारचे दिवे होते. मात्र, आता पहिल्या टप्प्यात काही सोडिअम वेपर दिव्यांसह ’एलईडी’प्रकारचे 120 दिवे बसवण्यात येणार आहेत. बोगदा दुहेरी मार्गिकेचा असल्याने 60 दिवे एका बाजूला, तर दुसर्‍या बाजूला 60 दिवे बसवण्यात येणार आहे, तर दुसर्‍या टप्प्यात सर्व दिवे ’एलईडी’ प्रकारातील बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे वीज खर्चात देखील बचत होणार आहे.

सशस्त्र सुरक्षारक्षक नेमणार
बोगद्यात यापूर्वी असणार्‍या विद्युत केबल या जमिनीलगत चर खोदून बसविण्यात आल्या होत्या. मात्र बोगद्यात वारंवार घडणार्‍याकेबल चोरीच्या किंवा केबल जाळण्याच्या घटना लक्षात घेऊन आता विद्युत केबल जमिनीपासून 20 फूट उंचावर बसविण्यात येणार आहे. ज्यामुळे अशा घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे. या बोगद्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्यादृष्टीने सध्याच्या विनाशस्त्र सुरक्षा रक्षकांऐवजी सशस्त्र सुरक्षा रक्षक नेमण्याचे देखील प्रस्तावित करण्यात येत आहे. बोगद्याच्या वरील डोंगरावर असणा-या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. ही जागा जिल्हाधिका-यांच्या अखत्यारितील असल्याने’जिल्हाधिकारी कार्यालय’ व मुंबई पोलीस यांच्या सहकार्याने तोडण्यात येणार आहे.